भानुदास कोंडेकर /निपाणी
खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा व चिंता बाजूला सारुन मनाला विरंगुळा देण्याचे तसेच शरीर व मन ताजेतवाने करण्याचे काम विविध खेळ करू शकतात. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना व नेतृत्वगुण यांना वाव मिळतो. त्या गुणांचा जीवनात विविधप्रसंगी उपयोग होतो. पण आजच्या धावत्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेल्या बालपणाबरोबर खेळही हरवत चालले आहेत. यातून मुलांमध्ये शारीरिक बरोबरच मानसिक दुर्बलताही येत आहे. यातून बाहेर पडताना सक्षम युवापिढी घडविण्यासाठी नववर्षात प्रत्येकाने संकल्प करणे आवश्यक आहे.
मोबाईलवरचे गेम खेळणाऱया मुलांचं कौतुक करत असतो. कुठे तरी आपलंही चुकते का, याचा विचार करायची वेळ येऊन गेली आहे. पण सुदैवाने खूप उशीर झालेला नाही. आताच हालचाल केली नाही, तर मात्र उशीर होईल. मग खरोखरच आणखी काही वर्षानी रिकामी मैदानं हवीत कशाला? असा प्रश्न उपस्थित होईल. यानंतर आपले आई-वडील त्यांच्या लहानपणी काय खेळ खेळायचे हे समजण्यासाठी तेव्हाची मुलं मग इंटरनेटवर सर्च करतील आणि मिळालेली उत्तरं हे त्यांच्या काळातल्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरचे त्यांचे अपडेट्स असतील.
मोबाईवर मनोरंजन व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्हॉट्सऍप, फेसबुक वापरत असताना ऑनलाईन गेम्स व बैठय़ा मनोरंजनाकडे जास्त कल असतो. परिणामी मुलांमध्ये एकाकीपणा वाढत चालला असून मैदानी खेळापासून मुले दुरावली
गेली.
सुट्टी लागताच स्पर्धेचा काळ असे सांगून प्रशिक्षण, शैक्षणिक तासांसाठी मुलांना गुंतवले जाते. मुले मैदानी खेळ खेळत नसल्याने मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर यामुळे चिडचिड, मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे पहावयास मिळत आहे. लहान मुले मैदानी खेळ खेळण्यापेक्षा घरी टीव्हीवरील छोटा भीम, मोटू-पतलू, निंजा हातोडी बघण्यात व्यग्र असल्याचे दिसतात.
यात बदल घडवून आणत मुलांना पारंपरिक खेळाकडे वळवणे खूप गरजेचे आहे. मोबाईल, कॉम्प्युटर यामुळे मुलांची कार्यक्षमता कमी होत चालली आहे.
करुया संकल्प युवापिढी सक्षम बनविण्याचा
अलीकडे पुरुषांच्याप्रमाणे महिलाही खोखो, कबड्डी, बॅटमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, कुस्ती यांसारखे खेळही खेळू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे पुरुषांच्या बरोबरीने मैदानी खेळाच्या शर्यतीतही भाग घेऊ लागल्या आहेत. शारीरिक कसरती व पोहण्याच्या शर्यती यातही त्या भाग घेतात. ऑलिम्पिक किंवा फक्त स्पर्धा पेंवा बक्षिस मिळविण्यासाठीच याकडे न पाहता शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी खेळाकडे वळणे आवश्यक आहे.
मोबाईलमधून बाहेर पडा
मुलांनी पारंपरिक खेळ न खेळल्यास भविष्यात मुले मनोरुग्ण होण्याची भीती आहे. याची दखल घेत पालकांनी म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने मोबाईल आणि सोशल मीडियाच्या मोहजाळातून बाहेर काढण्यासाठी नववर्षामध्ये संकल्प करण्यासह तो तडीस नेण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
खेळांमध्ये संधी, जागृतीची गरज
शैक्षणिक पद्धतीचे एक महत्त्वाचे अंग म्हणून खेळांकडे पाहिले जाते. खेळांना उत्तेजन देण्यासाठी खास सरकारी, तसेच शालेय आणि महाविद्यालयीन संस्था अनेक योजना आखत असतात. उत्कृष्ट खेळाडूंना सरकारी शिष्यवृतीही देण्यात येतात. त्यांच्या प्रशिक्षणाचीही देशात वा परदेशातही सोय केली जाते. विविध औद्योगिक व व्यावसायिक संस्थाही क्रीडासामने भरवितात. उत्कृष्ट खेळाडूंना संस्थांतून उत्तम प्रकारच्या नोकऱयाही मिळू शकतात. अशा प्रकारे आधुनिक काळात खेळांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे.