पोलीस प्रशासनाचे सोयिस्कर दुर्लक्ष : मैदाने, खुल्या जागांचा गैरवापर वाढला, निर्बंध घालण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहरातील खुल्या जागा, मैदाने व उद्यानांचा गैरवापर वाढला असून त्या ठिकाणी मद्य ढोसणे, गांजा ओढणे यासह इतर गैरप्रकार सुरू आहेत. याबाबत सर्वसामान्य जनतेतून तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत अनेकांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदनेही दिली आहेत. तेंव्हा पोलिसांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. चोऱया, घरफोडय़ा, खून असे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांतूनही या घटना घडत आहेत. तेंव्हा शहर तसेच उपनगरांमध्ये असलेल्या खुल्या जागा तसेच मैदानांवर सुरू असलेले अवैध प्रकार थांबवावेत, अशी मागणी होत आहे.
खुल्या जागा, मैदाने व उद्यानांचा मूळ उद्देश बाजूला राहून इतर खासगी कारणांसाठी या जागा वापरल्या जात असून ते कायद्याने चुकीचे आहे. सध्या उन्हाळय़ाला सुरुवात झाली असून अनेकजण गारवा शोधण्यासाठी अशा जागांचा वापर करतात. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यावर निर्बंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. सायंकाळी तसेच रात्री या परिसरात गस्त घालणे महत्त्वाचे आहे. अनेकवेळा या ठिकाणी हाणामारीचे प्रकार देखील घडत आहेत.
महाद्वार रोड परिसरात दोन ते तीन वर्षांपूर्वी एका शेतकऱयावर गोळी झाडण्याचा प्रकार घडला होता. ती गोळी कोणी झाडली? असा प्रश्न पडला होता. तेंव्हा खुल्या जागा आणि रहदारी कमी असलेल्या खुल्या जागांच्या परिसरांत हे गैरप्रकार सुरू आहेत. सध्या प्लास्टिकचा वापर सर्वच कामांसाठी केला जात आहे. प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी, प्लास्टिक ग्लास आणि खाण्यासाठी चकना घेवून मद्यपी ठाण मांडून बसत आहेत. 2 ते 3 पेग झाल्यानंतर हेच मद्यपी आरडाओरड करतात. त्यानंतर ये-जा करणाऱयांशी हुज्जत घालणे, त्यांना मारहाण करणे व त्यांच्याकडील पैसेही काढुन घेणे असे प्रकार घडतात.
गांजा ओढणारे व जुगारीही अशा खुल्या जागांच्या परिसरात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्या विरोधात तक्रार केली की संबंधीत व्यक्तीला तुला बघून घेतो… म्हणून धमकी देणे असे प्रकार घडत आहेत. मैदान परिसरातच काही ठिकाणी आपला अवैध व्यवसाय सुरू करत असून त्यांना पोलिसांचा पाठिंबा देखील मिळतो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्याने, खुल्या जागांच्या उपयोगातील हेतूंचा अनेकांना विसर पडल्याचेच दिसून येत आहे. रात्रीच्यावेळी तर अनेक ठिकाणी अवैध धंद्यांना ऊत आलेला असतो. याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच शहरामध्ये गुह्यांचा आलेख वाढला आहे.
सध्या या जागांचा गैरवापर करणारी मंडळी प्रशासकीय सहकार्याचा लाभ घेऊ लागली असून संबंधित जागांमध्ये तसेच आसपासच्या परिसरात चुकीचे धंदे थाटू लागली आहेत. परिणामी याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि मॉर्निंग वॉकर्सना बसत आहे. उष्म्यामुळे रात्रीच्यावेळी देखील वृद्ध तसेच अनेक दाम्पत्ये बाहेर फिरण्यासाठी जात असतात. मात्र अशा प्रकारांमुळे त्यांना देखील घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. अनेक महिलांच्या छेड काढण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. परिणामी याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे.
शहर तसेच उपनगरांमध्ये अनेक उद्याने आणि मैदाने आहेत. मात्र या ठिकाणी नको ते करण्यातच अनेकांनी धन्यता मानली आहे. रात्रीच्यावेळी तर मद्यपी तेथेच दारू पिऊन बाटल्या फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. खेळणाऱया मुलांना तसेच फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना या फुटलेल्या काचांचा त्रास होत आहे. तेंव्हा पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. याबाबत काही संघटनांनी जिल्हाधिकाऱयांना यापूर्वीच निवेदन दिले आहे. मात्र अद्याप याबाबत जिल्हाधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष न दिल्याचे दिसून येत आहे. आता उन्हाळा असल्याने शाळांना सुटी पडणार आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना घेवून खेळण्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. तेंव्हा मैदाने आणि खुल्या जागांच्या परिसरात होणाऱया गैरप्रकारांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी जोर धरु लागली आहे.