1981 मेलबर्न कसोटी लढतीतील आठवणीला सुनील गावसकरांचा उजाळा
मेलबर्न / वृत्तसंस्था
1981 मधील ऑस्ट्रेलिया दौऱयात सुनील गावसकरांनी पायचीत बाद दिले गेल्यानंतर सहकारी सलामीवीर चेतन चौहानसमवेत मैदान सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, त्यावेळी आपण त्या निर्णयावर नाराज होत नव्हे तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या शेरेबाजीमुळे आपण ते पाऊल उचलले होते, असे सनी यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्याला उद्देशून ‘गेट लॉस्ट’ असे शब्द उच्चारले होते, असे गावसकर याप्रसंगी म्हणाले. लिलीनेच असे म्हटल्याचे मानले जाते.
1981 मधील त्या मालिकेत खराब पंचगिरीचे सातत्याने दाखले मिळाले. त्यावेळी डेनिस लिलीचा इनकटर चेंडू गावसकरांच्या पॅडवर येऊन आदळला. लिलीसह सहकाऱयांनी अपील केल्यानंतर मैदानी पंच रेक्स व्हाईटहेड यांनी गावसकरांना बाद दिले. मात्र, गावसकरांना चेंडू बॅटला स्पर्शून पॅडवर आदळल्याचे वाटले आणि त्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी ते काही सेकंद आपल्या जागेवरच थांबून राहिले होते.
गावसकरांनी त्या डावात 70 धावा जमवल्या आणि त्या मालिकेत हीच त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. पंचांच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी आपल्या पॅडवर बॅटने जोरदार प्रहारही केले होते. त्या घटनेचा खुलासा करताना गावसकर म्हणाले, ‘बाद दिले गेल्यानंतर मी थक्क झालो. मैदानी पंचांनी बाद दिले असल्याने मला जाणे भाग होते. पण, नॉन स्ट्रायकर एण्डवरील चेतन चौहानच्या पुढे जात असताना एका खेळाडूने गेट लॉस्ट असे म्हटले आणि त्यामुळे मी पुन्हा मागे फिरलो आणि चेतन चौहानला सोबत घेऊन मैदान सोडण्याचा निर्णय घेतला’
चौहानने त्यावेळी सनीच्या सूचनेनुसार मैदान सोडले. पण, सीमारेषेजवळ संघव्यवस्थापक शाहिद दुर्राणी व सहायक व्यवस्थापक बापू नाडकर्णी यांनी यापैकी चौहानला मैदानात परत जाण्यास सांगितले आणि नव्या सहकारी फलंदाजासह चौहान पुन्हा क्रीझकडे वळला. यावेळी गावसकर व लिली यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. त्याबद्दल गावसकर म्हणाले, ‘डेनिस मला सांगत होता की, चेंडू पॅडवरच आदळला आणि मी त्याला सांगत होतो की, त्यापूर्वी चेंडूला बॅटचा स्पर्श झाला आहे. इनसाईड एज लागले असल्याचे फॉरवर्ड शॉर्ट लेगवरील क्षेत्ररक्षकाने पाहिले होते. त्यामुळे, त्याने अपीलही केले नव्हते. पण, तरीही मला बाद दिले गेले होते. त्यामुळे नाराजी साहजिक होती. अर्थात, मैदान अशा पद्धतीने सोडणे गरजेचे नव्हते. मला त्याबद्दल आजही खंत वाटते’.