एव्हरग्रीन, चार्मिंग, चॉकलेट हिरो ऋषी कपूर यांचे निधन झाले. विश्वास बसायला कठीण अशी ही बातमी. इरफान खान पाठोपाठचा दुसरा धक्का. भारतीय चित्रपटसृष्टीतला एक रोमँटिक हिरो म्हणून सदासर्वकाळ ज्याचे नाव घेतले जाईल असा हा कलाकार. कपूर खानदानाने हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे. आजोबा पृथ्वीराज कपूर, वडील राज, काका शम्मी आणि शशी कपूर, भाऊ रणधीर अशी घरात मांदियाळी असताना ऋषी कपूरला यशस्वी होणे गरजेचेच होते. आणि त्याने लोकांच्या भावभावनांवर राज्य केले. त्यांच्या प्रेम, रोमान्स आणि वैवाहिक जीवनात तो गीतांच्या रूपाने जिवंत राहिला आहे. तब्बल तीन दशकांचा नायक आणि चार पिढय़ांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य घटक बनला. त्यामुळे त्याला विसरणे, भारतीय सिनेरसिकाच्या आयुष्यातून त्याच्या गाण्यांना आणि त्यालाही वेगळे करणे अशक्य आहे. जीवनाचे वास्तव मांडणारा वैश्विक सिनेमा सर्वत्र मान्यता मिळवून आहे. पण, भारतीय सिनेमा जो मुळातच इथल्या मातीत रुजलेल्या नाटय़कलेपासून स्वतःला वेगळे न करता जन्माला आला तो कॅमेरा या तंत्राची भाषा शिकला. पण, त्या बरोबरीने नृत्य, नाटय़, गीत, संगीत ही भारतीय नाटय़शास्त्राची सर्व वैशिष्टय़ेही त्याने सोबत घेतली. पंजाबी सिने कलाकारांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मग या मेलडी आणि ड्राम्यासहीत प्रेमाच्या रंगात इतके रंगवले की, तीच व्यावसायिक सिनेमाची ओळख, यशाची गुरुकिल्ली बनली. नाटकातूनच आलेल्या पृथ्वीराज कपूर यांनी ते वळण तसेच स्वतःत आणले. राज कपूर हा तर ग्रेट शोमन. त्याने या ‘पुरखों की जायदाद’ला तसेच पुढे नेले. त्याच्या कलेत थोडी समांतर सिनेमाची अंधूक वाट दिसायची. पण व्यावसायिक डोलारा सांभाळण्यासाठी शोमनने त्यात कारुण्य-प्रेम आणि ड्रामा भरभरून आणला. समकालीन सर्वच चित्रपटही तसेच लोकप्रिय होत होते. हाच वारसा घेऊन ऋषी कपूर सिनेसृष्टीत आला. श्री 420 मध्ये प्यार हुआ…या गाण्यात अगदी बाल्यावस्थेतील ऋषी कपूर दिसला. पुढे मेरा नाम जोकरमध्ये त्याने राज कपूरच्या पौगंडावस्थेतील-छोटय़ा जोकरची भूमिका साकारली. या भूमिकेने त्याला पदार्पणातील उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राज कपूरसमोर हा पुरस्कार घेऊन तो उभा राहिला तेव्हा त्याने आजोबांना पुरस्कार दाखवायला सांगितला. छोटय़ा ऋषीच्या हातातील तो सर्वोच्च पुरस्कार पाहून पृथ्वीराज कपूरांच्या डोळय़ात अश्रू उभे राहिले. ‘राज आता माझ्या कर्जातून मुक्त झाला’ हे आजोबांचे बोलणे त्या वयात ऋषी कपूर समजू शकला नाही. पण, शोमन राज कपूरला ऋषीने आणखी एकदा कर्जमुक्त केले ते 1972-73 मध्ये बॉबीद्वारे. राज कपूरच्या या सिनेमातून विशीतल्या ऋषी आणि डिंपलने पराक्रम गाजवला. बॉबी प्रचंड लोकप्रिय झाला. आजपर्यंत बाबा आजांच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत अनेकजण आले. पण, यशस्वी झालेच असे नाही. ऋषी कपूरकडे त्याकाळातील पंजाबी हिरोंसारखी उंची नव्हती, तब्बेतही नव्हती. पण, त्याचा चेहरा चॉकलेट हिरोचा होता. तेच त्याच्या यशाचे गमक ठरले. आयुष्यभर त्याची पाठ सोडली नाही. कपूर नावाच्या फायद्याबरोबर अपेक्षांचे ओझेही कायम राहिले. बॉबीनंतरचा जहरिला इन्सान हा सिनेमा दणकून आपटला. नीतू सिंगशी पुढे अनेक चित्रपटात त्याची जोडी गाजली. ती त्याची जोडीदारीणही झाली आणि वयाच्या 21 व्या वर्षी यशाच्या शिखरावर असताना तिने इंडस्ट्रीला रामराम ठोकून संसार सांभाळला. ऋषी मात्र यशाच्या आणि चॉकलेट हिरोच्या कल्पनेतच गुरफटून गेला. या काळात त्याने त्यासाठीही घेतलेले कष्ट, सोबतीला एकाहून एक सरस गाणी त्याला लोकप्रिय बनवत गेली. बॉबीमध्ये त्याने वापरलेली राजदूत जीटीएस गाडी पुढे जगभर प्रसिद्ध झाली ती बॉबी गाडी म्हणूनच. 50 वर्षे झाली तरी त्याचे अनेक चाहते ही गाडी सांभाळून आहेत. त्याने हातात गिटार घेतली, डफली वाजवली, मफलर, स्वेटर घातला, कपाळावर पट्टी बांधली, तेंडात पान चघळले काहीही केले तरी ते गाजू लागले. मल्टी स्टारकास्ट सिनेमासाठीही तो असणे ही यशस्वीतेसाठीची गरज बनली. अमर अकबर ऍन्थोनी, कुली, दामिनीपासून शाहरूखच्या दीवानापर्यंत अनेकदा हे सिद्ध झाले. पण हे सगळे करताना आणि पंजाबी सिनेकलाकारांच्या फर्माइशी पुऱया करत नायिकांसह झाडामागे धावताना आपल्यातील कलाकाराला पुरेसा वाव मिळाला नाही याची खंतही त्याला होती. डिंपल इंडस्ट्रीतून बाहेर गेली. परत आली, रूदाली सारख्या भूमिका तिने केल्या. पण ऋषी कपूरला त्यासाठी खूप वेळ लागला. राजेश खन्ना, देव आनंद यांच्यासारखेच तोही यशावर आरूढ होत गेला. उतारवयात रौफ लाला सारख्या भूमिकेतून त्याने त्याच्यातील कलाकाराला वाव दिला. अलीकडच्या त्याच्या सर्व भूमिका लोकांच्या लक्षात राहणाऱया झाल्या. पण, तोपर्यंत त्याचा मुलगा रणबीर नायकाच्या भूमिकेत गाजू लागला होता! कपूरांच्या यशस्वितेच्या वेडामुळे त्याला आपल्या मुलाने केलेल्या रॉकेटसिंग, बर्फी सारख्या भूमिका करू नयेत असे वाटत होते. कारण, इंडस्ट्रीतील लोक ‘तुझा मुलगा स्टार बनणार आहे की अमोल पालेकर?’ असे विचारत होते. पण, आपला मुलगा योग्य होता हे त्याने प्रांजळपणे मान्य केले. ही जिंदादिली त्याने आयुष्यभर जपली. हल्ली तर ट्विटरवर त्याची वक्तव्ये वादग्रस्त ठरत. पण, तरीही तो व्यक्त होतच राहिला. आज जेव्हा त्याच्या मृत्यूची वार्ता पसरली तेव्हा प्रत्येक भारतीय घर जुन्या आठवणीत गेलेले अनुभवायला आले. कर्ज या चित्रपटातील ओम शांती ओम या त्याच्या गाण्याची ला ला ला ला, ला ला ला ला ही सुरुवात… प्रत्येक पिढीतील नौजवानांना त्याच्याच ‘उमर’चे ठेवेल. त्याची ती सारी गीते अजरामर राहतील यात शंकाच नाही. कोरोनामुळे चाहत्यांना त्याचे अंत्यदर्शन घेता आले नाही. यापूर्वी एक चॉकलेट हिरो देव आनंदने आपला मृतदेह रसिकांच्या नजरेस पडू दिला नव्हता. लंडनमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यामुळे आजही देव आनंदचा सचेत चेहराच रसिकांच्या मनात राहिला आहे. ऋषी कपूरच्या बाबतीत कोरोनामुळे ते आपोआपच घडून आले. मैं शायर तो नहीं, हम तुम एक कंबरे मे बंद हो म्हणणारा तो चॉकलेट हिरोचा चेहरा आणि त्याच्या जीवनाचे गाणे तसेच अमर राहिले….
Next Article वीज मागणी 30 टक्क्यांनी घटली
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.