प्रतिनिधी / सातारा :
फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथील ज्योतीराम शंकर चव्हाण खून प्रकरणी 2015 साली 10 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी अधिनियमाखाली मोक्का लावण्यात आला. मात्र, यातील मुख्य आरोपी शंकर अपुंश खवळे हा त्या घटनेपासून फरारी होता. त्याला जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
2015 साली झिरपवाडीतील ज्योतीराम शंकर चव्हाण यांच्यावर जुन्या भांडणाच्या कारणातून तसेच केस मागे घेत नसल्याने पिस्टलने गोळी झाडून स्वप्नील काकडे, बंटी काकडे, शरद खवळे, सागर मोरे, सूरज अहिवळे, मंगेश रणदिवे यांनी खून केला होता. या खुनाच्या घटनेतील फिर्यादी विशाल रघुनाथ ढेंबरे (रा. झिरपवाडी) हा भांडणे सोडवण्यासाठी गेला असताना शरद खवळे याने तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी 10 आरोपींना अटक केली होती व त्यांना मोक्का लावलेला होता. मात्र, शरद अंकुश खवळे हा फरारी होता. तो वारंवार ठिकाणे बदलून रहात पोलिसांना गुंगारा देत होता. तो 3 ऑक्टोबर रोजी सावळ, ता. बारामती येथे येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पथक पाठवून तिथे सापळा रचून शरद खवळे याला अटक केली. त्याला फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.