तीस टक्के कर्मचारी-अधिकाऱयांची उपस्थिती : सर्वांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन
प्रतिनिधी / पणजी
रविवार 22 मार्चपसून सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या गेल्या सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर काल सोमवारी 20 एप्रिलपासून काही मर्यादीत सरकरी कार्यालयांचा कारभार मर्यादीत स्वरूपात सुरू झाला असून पहिल्या दिवशी 25 ते 30 टक्के कर्मचारीवर्गाची हजेरी लागल्याचे दिसून आले. गावातून तसेच प्रमुख शहरातून सरकारी कार्यालयात येण्यासाठी ‘कदंब’ बसगाडय़ा कालपासून चालू करण्यात आल्या असून येत्या 3 मे पर्यंत म्हणजेच लॉकडाऊन असेपर्यंत असाच सरकारी कारभार पुढे नेण्याचा राज्य सरकारचा इरादा आहे.
अनेक सरकारी कार्यालये काल एक महिन्याच्या कालावधीनंतर उघडण्यात आली. तत्पूर्वी ती निर्जतूंक करण्यात आली असून हजेरी लावलेल्या सर्व कर्मचारी, अधिकारीवर्गाने मास्क लावून काम केले. शिवाय एक मीटर अंतर पाळण्यात आले. ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही ते कदंब बसगाडीतून आले तर अनेकजण स्वतःच्या वाहनांनी आपापल्या कार्यालयात हजर झाले.
सर्वांच्या चेहऱयांवर दिसला आनंद
कर्मचारी व अधिकारीवर्गाने एकमेकांची खुशाली विचारली, विचारपूस केली. महिन्याभरानंतर पुन्हा एकदा एकमेकांना भेटल्याचा आनंद सर्व कर्मचारी, अधिकाऱयांना झाला. ही हजेरी तसेच उपस्थिती हळुहळू वाढण्याची अपेक्षा असून कालांतराने कामकाज 50 टक्क्यापर्यंत पुढे जाईल आणि लॉकडाऊन संपल्यानंतर पूर्ण क्षमतेने 100 टक्के सरकारी कारभार सुरू होईल अशी अपेक्षा सरकारी सूत्रांनी व्यक्त केली.
मोजक्याच खात्यांचे मर्यादीत कामकाज
पोलीस, सार्वजनिक बांधकाम, वीज, जिल्हाधिकारी कार्यालये, कृषी खाते अशा विविध खात्यांची कार्यालये काल सोमवारपासून पुन्हा एकदा चालू होऊन गजबजू लागली आहेत. पण उपस्तिथी मात्र कमी आहे. अनेक गावात कदंब बसगाडय़ा पोहोचू शकल्या नाहीत शिवाय अनेक कर्मचारी मुख्य रस्त्यापासून आतमध्ये राहत असल्याने त्यांना सरकारी कार्यालयात उपस्थित राहणे शक्य झाले नाही. लोकांना मात्र सध्या तरी सरकारी कार्यालयात प्रवेश नाही. लोकांनी सरकारी कार्यालयामंध्ये जाऊ नये असे कळवण्यात आले आहे.
कर्मचारी, अधिकाऱयांकडून नियमांचे पालन
कर्मचारी, अधिकारीवर्गाने मास्क लावूनच काम करणे पसंत केले. कदंब बसगाडीत फक्त सरकारी कर्मचारी अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात आला. एक पूर्ण आसनावर फक्त एकच प्रवासी कर्मचारी असे चित्र होते. प्रत्येक कदंब बसगाडीतून 20 ते 25 जणच येऊ शकले. इतर प्रवाशांना कदंब बसगाडीत प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना माघारी परतावे लागले. सायंकाळी पुन्हा कदंब बसगाडीतून कर्मचारी घरी परतले. येत्या 3 मे पर्यंतच्या लॉकडाऊन काळात अशीच वाहतूक सेवा सरकारी कर्मचाऱयांना देण्यात येणार असून शनिवारी-रविवारी सुटी असल्याने कदंब बसगाडय़ा बंद रहातील. पुन्हा सोमवारपासून पुर्ववत होतील अशी माहिती देण्यात आली.