मुंबई/प्रतिनिधी
कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील अन्य परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन साखळीत झालं आहे. पावसाने नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी नेतेमंडळी सरसावले आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी मदतकार्याचा पाहणी दौरे करून नुकसानीचा आढावा घेतला. पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे, असं सांगतानाच केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
कोकणात महापुरानं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही आज कँम्प राबवतोय. राज्य सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे, असं सांगतानाच पंचनामे झाल्यावर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केलं जाईल. पॅकेज जाहीर करणं अत्यंत आवश्यक आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.