उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
प्रतिनिधी/मुंबई
राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी जाहीर केले. कुलगुरूंसोबत परीक्षांसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचे निश्चित झाले. या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. मात्र कडक निर्बंधांमुळे आता ऊर्वरित सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असा निर्णय झाल्याचे सामंत यांनी सांगितले.
तेराही अकृषी विद्यांपीठात शुक्रवारपासून ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टीवायचीही परीक्षाही ऑनलाईन असेल, असे उदय सामंत म्हणाले.
37 लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण
उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे. यामुळे निकाल लवकर लागेल. राज्यातील 37 लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा विचार आहे. 18 ते 25 वयोगटातील हे विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्याचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे सामंत म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेत एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा विचार आहे. हे विद्यार्थी लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होतील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यात ऑक्सिजन कमतरता नाही. लस व रेमडेसिवीरचे समान वाटप पेंद्राने करावे, असे उदय सामंत म्हणाले.
कायद्याच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
कायदाच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार आहोत. कोविडचे संकट कमी झाल्यावर प्राध्यापकांची भरतीही करण्यात येणार आहे, असे सामंत म्हणाले.