ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशियाने गुरुवारी युक्रेनवर लष्करी कारवाई करत चौफेर हल्ले केले. यात युक्रेनचे 74 लष्करी तळ उद्ध्वस्त झाले, असून, शंभरहून अधिक सैनिक नागरिक ठार झाले आहेत. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.
पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, फोनवरुन झालेल्या संवादात पुतिन यांनी मोदींना घडलेल्या घडामोडींची माहिती दिली. त्यानंतर रशिया आणि नाटो गटांमधील मतभेद संवादातूनच सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे हिंसाचार ताबडतोब थांबवण्यास सांगत मोदींनी सर्व पक्षांना राजनैतिक संवाद आणि संवादाच्या मार्गावर परतण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यास भारताचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही मोदी यांनी यावेळी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या देशांमधील अधिकारी आणि संबंधित व्यक्ती या प्रकरणासंदर्भात सतत संपर्कात राहतील यावर शिक्कामोर्तबही केल्याचं सांगण्यात आलं आहे.
रम्यान, भारताचे रशियाशी विशेष संबंध आहेत आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका बजावू शकते, असे युक्रेनने म्हटले होते. रशियन हल्ल्यानंतर युक्रेननं भारताचा पाठिंबा मागितल्यानंतर काही तासांनंतर मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवर संभाषण झालं. यात भारताने सावध भूमिका घेत लोकशाही मार्गाने आणि चर्चेमधून वाटाघाटी करुन हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, असे पुतिन यांना सांगितले.