राजकारणात कोणी कायमचे शत्रू अथवा मित्र नसतात त्यामुळे सत्ताधारी पक्षातील समीकरणे पुढील दोन वर्षात काय आकार घेतात त्यावर उत्तर प्रदेश आणि देशातील पुढील चित्र काय राहणार ते ठरणार आहे.
राजकारणात कधी कधी कल्पितापेक्षा अद्भुत गोष्टी घडत असतात. गेल्या आठवडय़ात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजपश्रे÷ाrंनी दिल्लीला पाचारण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उजवे हात समजल्या जाणाऱया गृहमंत्री अमित शहा यांनी योगींच्या हाती नारळ देण्याचा कार्यक्रम पक्का केला होता. योगी स्वतंत्रपणे वागत असल्याने आणि काही बाबतीत त्यांच्या म्हणण्यालादेखील फारसे महत्त्व देत नसल्याने उत्तर प्रदेशात नवीन प्रयोग करण्यास मोदींचीदेखील ना नव्हती. मोदींचे खासमखास असलेले गुजरात कॅडरचे एक सनदी अधिकारी अरविंदकुमार शर्मा यांनी नोकरीचा राजीनामा देऊन उत्तर प्रदेशमधील आमदारकी मिळवली. शर्मा यांना उपमुख्यमंत्री करण्याची योजना योगींनी विरोध केल्याने ठप्प झाली. आता शर्मा यांना राज्य भाजपचा उपाध्यक्ष बनवण्यात आलेले आहे. आठ-दहा महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्या असताना नवीन नेत्याला उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री बनवून आपल्या हिमतीवर तिथे सरकार आणावयाची मोदी-शहा यांनी तयारी चालवली होती. त्यामागे कारणही तसेच होते. भगवा वस्त्रधारी योगी हे पंतप्रधानांप्रमाणे हिंदुत्वाचे ‘पोस्टर बॉय’ बनू लागले आहेत या भीतीने शहा हैराण झाले होते. नवी दिल्लीत मोदींचा मी ‘नैसर्गिक वारसदार’ आहे अशी प्रतिमा बनवण्यात शहा यशस्वी ठरले होते पण ज्या झंझावाती पद्धतीने योगींनी विविध राज्यात निवडणूक प्रचार केला होता त्याने त्यांची एक वेगळी पेझ भाजपच्या पारंपरिक मतदारात तयार झाली होती. निदान शहा यांना तरी तसे वाटत होते. उद्या उत्तर प्रदेशात योगी मुख्यमंत्री असताना भाजप परत सत्तेवर आला तर ‘मोदींचा मी नैसर्गिक उत्तराधिकारी’ आहे असा ते दावा करतील ही शहा यांची भीती होती आणि ती सर्वस्वी अनाठायी नव्हती.
उत्तर प्रदेशचे महत्त्वच तसे आहे. स्वतंत्र भारतात नेहरूंपासून झालेले बहुतांशी पंतप्रधान हे उत्तर प्रदेशातून आलेले आहेत. 2014 पासून मोदी देखील वाराणसीचेच प्रतिनिधित्व लोकसभेत करत आहेत हेही विसरून चालणार नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकीत ते गुजरातच्या बडोदामधून देखील निवडून आले होते. पण त्यांनी तेथून राजीनामा दिला होता. योगी म्हणूनच कोणाच्या डोळय़ात सलण्यासारखे होते. कारण ते मूळचे संघाचे नसले तरी आता संघाने त्यांना एकप्रकारे दत्तक घेतले होते. उत्तरेतील असल्याने राजकारणाचे बाळकडूच ते पिलेले असल्याने कोणाच्या धमक्मयांना घाबरण्याची त्यांना सवय नाही. त्यात योगी हे दबंग समजल्या जाणाऱया ठाकूर समाजातील असल्याने ‘अ रे ला का रे’ ने प्रत्यत्तर देणारे आहेत हे शहा आता जाणून चुकले आहेत.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जेव्हा त्यांना काढावयाचा डाव खेळला तेव्हा योगींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाला साकडे घालून या जीवघेण्या संकटातून स्वतःला फक्त वाचवलेच नाही तर शहा यांचा डाव त्यांच्याविरुद्धच अनपेक्षितपणे उलटवला. भाजपांतर्गत प्रश्नात शहा यांचा असा हिरमोड गेल्या सात वर्षात कधी झाला नव्हता. भाजपमधील बदलते राजकारणदेखील योगींच्या पथ्यावर पडलेले दिसत आहे. सत्ताधारी वर्तुळात असे बोलले जात आहे की मोदी आणि शहा हे दोघेही गुजरातचेच असल्याने संघाने सावध खेळी करून योगींच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले. यात कितपत तथ्य आहे ते पुढील घटना कशा घडतात त्यावरून दिसणार आहे. पण शहा-योगी वादात संघाने ठाम भूमिका घेतली नसती तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरून योगींना पायउतार व्हावे लागले असते हे तितकेच स्पष्ट आहे. याचाच अर्थ शहा-योगी भांडणाचा लाभ मोदी सत्तेवर आल्यापासून थोडय़ा बाजूला पडलेल्या संघाने आपले वजन वाढवण्यात केला. भाजपांतर्गत राजकारणाकरता ही घटना छोटी नव्हे आणि त्याचे परिणाम दिसणार आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत पाडापाडीचे राजकारण होणार हे सांगायला आता कोणा ज्योतिषाची गरज नाही. योगी आता खवळलेले आहेत आणि ‘मी म्हणेन ती पूर्व’ असाच त्यांचा खाक्मया राहिलेला आहे. राजकारणात कोणी कायमचे शत्रू अथवा मित्र नसतात त्यामुळे सत्ताधारी पक्षातील समीकरणे पुढील दोन वर्षात काय आकार घेतात त्यावर उत्तर प्रदेश आणि देशातील पुढील चित्र काय राहणार ते ठरणार आहे. उत्तर प्रदेशखेरीज बिहार आणि महाराष्ट्र या दोन राज्यातून भाजपला गेल्या दोन लोकसभा निवडणुकात चांगल्या जागा मिळाल्याने मोदींची केंद्रात सत्ता घट्ट झाली होती. आता बिहार आणि महाराष्ट्रात भाजपविरोधक पूर्वीसारखे नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील येती निवडणूक ही सत्ताधाऱयांकरता अतिमहत्त्वाची आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेने माजलेला हाहाकार काय रूप घेणार तेही या निवडणुकीने दिसणार आहे.
सुनील गाताडे