हिमालयात भारत-चीन सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. आता कोण काय करणार हे कळायला महिनोन्महिने लागू शकतात. सीमेवर बाका प्रसंग आहे. माघारीचे दोर कापले गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लडाखला दिलेल्या भेटीमुळे चीन बरोबरील सीमेवर वातावरण खरेच खूप तापले आहे आणि त्यातून युद्धाचा भडकादेखील उडू शकतो याचा पहिला संकेत सरकारने दिला आहे. मोदींनी आतापर्यंत चीनचे नाव घेतले नसले तरी त्यांची लेह भेट म्हणजे एक प्रकारे चीनला ललकारणेच आहे याबाबत तीळमात्र शंका आता राहिलेली नाही. विस्तारवादाविषयी त्यांनी केलेले भाष्य म्हणजे अलीकडील काळात चीनने लडाखमध्ये घुसखोरी केलेली आहे याची एकप्रकारे अप्रत्यक्ष कबुलीच होय. ‘दादा बाबा करून हा मग्रूर, आक्रस्ताळी आणि अतिमहत्त्वाकांक्षी देश वठणीवर येणार नाही आणि त्याला फक्त जोडय़ाचीच भाषा समजते’ अशा निष्कर्षाप्रत मोदी आलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो.
1962 मध्ये पं. नेहरूंचा विश्वासघात माओ आणि चोऊ एन लाय यांनी केला होता. आता अनपेक्षितपणे तीच पाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शी जीन पिंग यांनी आणली आहे असे चीन अभ्यासक म्हणत आहेत. गेल्या सहा वर्षात मोदी आणि शी यांच्या एकूण लहानमोठय़ा अशा 16 बैठका झाल्या होत्या. त्यातून मोदींची चीनला ‘चुचकारण्याची’ नीती दिसून आली असे गंभीर आरोप आता होत आहेत. गेल्या सहा वर्षात सरकारने चीनविषयक जे धोरण राबवले, ते फसले असेच या लेह भेटीतून दिसून येत आहे. मोदी म्हणजे फक्त ‘बोलका शंख’ आहे असा अंदाज शी यांनी बांधला आणि भारताला कांडात काढण्याचे कारस्थान फार शांतपणे आणि शिस्तबद्ध रीतीने सुरु केले असे हे तज्ञ मानतात. मोदींना आता शंख नाद करावा लागला तो याचसाठी.
अमेरिका आणि युरोपमधील प्रगत राष्ट्रे कोरोनाच्या विळख्यात अडकली असताना या संधीचा फायदा उठवत भारताला धडा शिकवू आणि आशिया खंडातील आपणच दादा आहोत हा संदेश सर्वदूर पसरवू असा या खेळीमागचा चीनचा डाव आहे. म्हणूनच ‘वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो’ असा चीनचा आक्रमक हावभाव राहिल्याने भारताने थोडे जरी नमते घेतले तरी तो त्याचा पराभव मानला जाईल हे सरतेशेवटी मोदी यांनी जाणलेले दिसत आहे.
अशावेळी चीनचे जुने मित्र आणि हितचिंतक समजले जाणारे भाजपचे जे÷ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी चीनला मित्रत्वाचा पण झोंबणारा सल्ला दिला आहे. जर भारताशी पुन्हा मैत्री हवी असेल तर 1993 मध्ये सीमारेषेबाबत जो करार झाला त्यानुसार चीनने भारतीय प्रदेशातून माघार घ्यावी. असे न केल्यास भारतीय सैन्याच्या दणक्मयामुळे त्याला सरतेशेवटी माघार घेणे भाग पडेल, असे भाकित स्वामींनी केले आहे. मनमोहनसिंग सरकारात 2004 नंतर बराच काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले एम. के. नारायणन यांच्यामते शी यांच्या बरोबरीच्या शिखर वार्तावर मोदींनी भर दिल्याने भारतीय परराष्ट्र मंत्रालय एक प्रकारे पंगू बनले आणि त्यातून चीनच्या हेतूबाबत त्याला अनुमान करता आले नाही. भारतात चीनविषयक तज्ञांचा अभाव आणि सरकारच्या इंटेलिजन्स संस्था चीनच्या धोक्मयाबाबत गाफिल राहिल्यानेदेखील हा अनावस्था प्रसंग ओढवलेला आहे असे ते म्हणतात.स्वातंत्र्योत्तर काळात चार मोठय़ा लढाया लढलेले भारतीय सैन्य दल हे चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीपेक्षा सरस आहे हे जाणकार मानतात. गलवान खोऱयात 20 भारतीय सैनिकांनी बलिदान देऊन चीनला घाम फोडला होता. चीनने त्याचा स्थानिक लष्करी कमांडर मारला गेला हेच फक्त कबुल केलेले आहे आणि त्याच्या मृत सैनिकांची संख्या जनतेपासून लपवून ठेवली आहे. या चकमकीत भारतापेक्षा चीनचे जास्त नुकसान झाले असे मानले जाते.
देर आये, दुरुस्त आये
पंतप्रधानांची ही लडाखची भेट ‘देर आये, दुरुस्त आये’ चा प्रकार आहे की अन्य काही ते येत्या काळात कशा घटना घडतात त्यावर अवलंबून आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंग, परराष्ट्र मंत्री जयशंकर तसेच भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्त्री यांनी चीनने केलेल्या घुसखोरीची प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कबुली दिली असली तरी साक्षात पंतप्रधानांनी मात्र अजून तसे म्हटलेले नाही. उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणाऱया मोदींनी 20 जवानांच्या बलिदानानंतर देखील अजून चीनचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्ष त्यांना अडचणीत आणत आहेत आणि ‘राज धर्माची’ त्यांना आठवण देत आहेत.
भारतीय सैन्याचे इरादे बुलंद असले तरी मोदी सरकारपुढे बरीच आव्हाने दत्त म्हणून उभी ठाकली असल्याने प्रत्येक पाऊल पूर्ण विचारांती टाकावे लागणार आहे. इकॉनॉमिस्ट या प्रख्यात आंतरराष्ट्रीय जर्नलनुसार जगातील 43 प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत हा बराच काळ तीन सर्वात वेगवान अर्थव्यवस्थांमध्ये होता. पण ढिसाळ कारभारामुळे आता त्याची गाडी एवढी घसरली आहे की तो 23व्या स्थानावर फेकला गेला आहे. कोलमडलेली अर्थव्यवस्था असताना भारताला युद्ध झेपणार आहे का असा सवाल जाणकार विचारत आहेत.दुष्काळात तेरावा महिना यावा त्याप्रमाणे कोरोनाच्या प्रसारामुळे सरकारच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या प्रसारात अमेरिका आणि ब्राझीलनंतर तिसऱया क्रमांकावर भारत येऊन ठेपला आहे.
पंतप्रधानांपुढे कसोटीची वेळ आली आहे. चीन बऱया बोलाने मागे फिरणार नाही. त्याला भारतीय भागातून हुसकावून लावावे लागेल. पण असे केले तर त्यातून युद्धाची ठिणगी पडू शकते. चीन ज्या आक्रमक पद्धतीने वागत आहे ते लक्षात घेतले तर भारताशी संबंध विकोपाला गेले तरी बेहत्तर पण तो मागे हटणार नाही. अशावेळी हिमालयात भारत-चीन सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. आता कोण काय करणार हे कळायला महिनोन्महिने लागू शकतात. सीमेवर बाका प्रसंग आहे. माघारीचे दोर कापले गेले आहेत. चीनने दक्षिण चिनी समुद्र, हाँगकाँग, तैवान आणि लडाख अशा बऱयाच आघाडय़ा एकाचवेळी उघडल्याने आंतरराष्ट्रीय जगतात क्षोभ माजवला आहे ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू आहे
सुनील गाताडे