पंतप्रधान मोदींच्या सभांना अलोट गर्दी, बिहारमध्ये चुरशीची निवडणूक, परिणामांसंबंधी उत्सुकता
मुझ्झफ्फरपूर / वृत्तसंस्था
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यातील मतदान येत्या मंगळवारी होत आहे. याच टप्प्यावर निवडणुकीचे परिणामही बव्हंशी अवलंबून आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील रालोआ आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महागठबंधन यांच्याकडून जोमदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी चार जनसभांना संबोधित केले. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांची लोकप्रियता या राज्यात सलग चौथ्या वेळी रालोआसाठी तारणहार ठरणार का, याची चर्चा जनतेमध्येही सुरू आहे.
मोदींनी रविवारी छापरा, समस्तीपूर, मोतीहारी आणि बगाहा अशा चार स्थानी जनसभा घेतल्या. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात गेली पंधरा वर्षे बिहारमध्ये विकासाची असंख्य कामे झाली आहेत. भय आणि असुरक्षिततेपासून या राज्याला मुक्तता मिळाली आहे. त्यापूर्वीच्या काळात अव्यवस्था आणि अनाचाराचे थैमान राज्यात होते. मतदारांना या दोन्ही स्थितींची पूर्ण कल्पना असून ते रालोआलाच भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रालोआने बिहारला त्याच्या आजारी स्थितीतून बाहेर काढले. रालोआला या निवडणुकीत पडलेले प्रत्येक मत बिहारला पुन्हा आजारी होण्यापासून वाचविणार आहे. विरोधी पक्ष केवळ त्यांना कुटुंबांच्या हिताची काळजी करतात. त्यांना राज्याच्या हिताची कोणतीही चिंता नाही, अशी टीका त्यांनी केली.
छटपूजा निःशंक मनाने करा
यंदा छटपूजा करता येणार की नाही, अशी शंका बिहारमधील मातांच्या मनात निर्माण केली जात आहे. पण अफवांवर विश्वास न ठेवता निर्भयपणे छटपूजा करा. आपली चिंता वाहण्यासाठी आपला ‘पुत्र’ दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे, अशज् शब्दांमध्ये त्यांनी महिला मतदारांना रालोआला मते देण्याचे आवाहन केले. आत्मनिर्भर भारताप्रमाणेच आत्मनिर्भर बिहार होण्यासाठी पुन्हा रालोआला संधी द्या. पुन्हा जंगलराज आणणे राज्याच्या हिताचे नाही, असेही आवाहन त्यांनी केले.
सामान्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
या निवडणुकीच्या निमित्ताने विविध वृत्तसंस्थांच्या पत्रकारांनी जनमताचा कानोसा घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर कोणत्या पक्षाची स्थिती काय आहे, याचे अनुमानही अनेकांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता अबाधित असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. नितीश कुमार यांच्यासंबंधी काहीशी नाराजी असली त्यांनी केलेली कामे आजही अनेक मतदारांना महत्वाची वाटतात, असेही या पत्रकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल. अनेक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ टक्कर आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोण पारडे फिरविणार यावर परिणाम अवलंबून राहतील. कोणत्याही एका बाजूला लाट असल्याचे दिसत नाही, असेही त्यांचे मत आहे.