पुलाची शिरोली/ वार्ताहर
२० सप्टेंबर रोजी पास केलेले तीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांना ईस्ट इंडिया कंपनी सारख्या व्यवस्थेच्या पारतंत्र्यात घेऊन जाईल. अत्यावश्यक वस्तू कायद्यातील सुधारणा, कंत्राटी शेती, शेतमालाला हमीभाव नाकारणे अशा शेती धोरणातून नरेंद्र मोदी हे अंबानी अदानी सारख्या धनदांडग्यांना शेतकऱ्यांचे शोषण करण्यासाठी खुली सूट देत आहेत. सहकार व्यवस्थेत दोष आहेत ते दोष दूर करणे गरजेचे असताना त्याऐवजी पर्याय म्हणून खाजगीकरण करणे आत्मघातकी आहे असे प्रतिपादन माजी खासदार व शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी पुलाची पुलाची येथील सभेत बोलताना केले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती हातकणंगले यांच्यावतीने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. नरेंद्र मोदी नोटबंदी व जीएसटी सारखे आत्मघातकी धोरणे शेती क्षेत्रात राबवू इच्छित आहेत. कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण वाढून भांडवलदारांची मक्तेदारी निर्माण होईल. शेतकरी त्यांचे मनसुबे उधळून लावतील.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सह सेक्रेटरी गिरीश फोंडे म्हणाले, दिल्लीमध्ये शेतकरी कडाक्याच्या थंडीत आपली प्राणाची बाजी लावून ऐतिहासिक आंदोलन करत आहेत. बिहार मध्ये २०९६ सालीच हमीभावाचा कायदा रद्द केला .त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना वाईट परिणाम भोगावे लागले. हा केवळ शेतकऱ्यांचा लढा नसून शेतमालाचा साठा करणाऱ्या भांडवल दाराकडून ग्राहकांची शोषणातून मुक्तता करण्याचा लढा आहे. स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष वैभव कांबळे यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या सोबत महाराष्ट्रातील शेतकरी खांद्याला खांदा लावून लढतील असे आश्वासन दिले.
स्वागत व प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन युथ फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष जावेद तांबोळी यांनी केले. तर आभार माजी उपसरपंच बाजीराव सातपुते यांनी मानले .
यावेळी वैभव कांबळे, कृष्णात खवरे, श्रीकांत खटाळे, निशिकांत पद्माई, उत्तम पाटील, विशाल माने (हालोंडी), सुनंदा शिंदे, आर. आर. पाटील, उदय पाटील, जयश्री नाईक, शौकत देसाई, सुरज लंबे (नागाव)तात्याभाऊ पाटील, बाजीराव पाटील, राम बुडकर, प्रकाश परमाज यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.