राजधानीत सध्या विविध अफवा चर्चेत आहेत. यात कितपत तथ्य आहे हे अधिवेशन सुरू होईपर्यंत कळून येईल. जर का असा फटाका फुटला तर मात्र विरोधी पक्षांना आयतेच कोलित हाती येणार आहे. मग सारे अधिवेशनच वादळी ठरणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची जरुरी नाही.
गेल्या सात वर्षात जे झाले ते अगोदरच्या 70 वर्षात झाले नव्हते. दहा दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात 12 मंत्र्यांच्या हाती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारळ देणे म्हणजे एक विक्रमच. नवीन संसद भवनाची पायाभरणी झाली आणि तिच्या कामाला वेगवान गतीने सुरुवात करून पुढील वषीच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या सोहळय़ात नवीन वास्तूत पदार्पण करण्याचा संकल्प करणे हाही एक विक्रमच. संसदेच्या दोन्ही सदनाचे नेते हे गुजरातमधील हादेखील विक्रमच. पियुष गोयल हे महाराष्ट्रातून निवडून आले असले तरी आर्थिक आणि राजकीय वर्तुळात त्यांना गुजरातमधीलच मानले जाते. मोदींच्या
प्रभामंडळातील असल्याने त्यांचे भाजपच्या राजकारणात बस्तान बसले.
पंतप्रधान देशाच्या कारभारात गुंतलेले असल्याने लोकसभा आणि राज्यसभा या गृह मंत्री अमित शहा यांच्या देखरेखीखाली असतात ते शहा देखील गुजरातचेच. माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांना मोदींनी परराष्ट्र मंत्री बनवले तेव्हा त्यांना देखील गुजरातमधूनच राज्यसभेवर घेण्यात आलेले होते. मूळचे गुजरातचे असलेले पण उत्तर प्रदेशमधून निवडून आलेले पंतप्रधान, गृह मंत्री आणि परराष्ट्र मंत्री तसेच महामारीच्या काळात सर्वात महत्त्वाचे ठरलेले आरोग्य खाते सांभाळणारे मनसुख मांडवीय हे सारे गुजरातमधून निवडून आलेले तर इतर काही महत्त्वाच्या मंत्र्यांची नाळ कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या राज्याशी जुळलेली. हाही एक विक्रमच.
त्याचबरोबर ज्याला भाजपमध्येदेखील फारसे कोणी ओळखत नाही अशाला महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री बनवणे हादेखील एक विक्रमच. रेल्वे खाते मिळण्यासाठी गेल्या सत्तर वर्षात किती चढाओढ लागली. लालबहादूर शास्त्री, मधू दंडवते, सी के जाफर शरीफ, रामविलास पासवान, नितीश कुमार, लालू यादव आणि ममता बॅनर्जी अशा भल्या थोर नेत्यांनी ज्या रेल्वे मंत्रालयाची धुरा सांभाळली होती तिचा कारभार अश्विनी वैष्णव या नोकरशहाकडे कशामुळे गेला हे सामान्य पक्षकार्यकर्त्याला अनाकलनीय कोडे राहिले आहे. वैष्णव यांना टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञान ही इतर दोन मोठी खाती मिळाली आहेत. वैष्णव हे ओडिशाहून निवडून आले असले तरी त्यांनी गुजरातमध्ये उद्योग सुरू केला आहे. या मंत्रिमंडळात नवे-जुने असे मिळून सात पूर्वाश्रमीचे नोकरशहा आहेत. जयशंकर यांच्याशिवाय हरदीप पुरी, आर के सिंग, वैष्णव हे त्यांच्यापैकी काहीजण.
स्वातंत्र्योत्तर काळात कोणत्याच मंत्रिमंडळात ‘बाबू’ मंडळींचा एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर समावेश नव्हता. मोदी हे नोकरशहांवर जास्त भिस्त ठेवतात ते पंतप्रधान कार्यालयात देखील कॅबिनेट मंत्री दर्जा दिलेले काही उच्च अधिकारी आहेत त्यावरून दिसते. नोकरशहांचा असा हा आगळा दबदबा हा देखील एक विक्रमच. काँग्रेसने मनमोहनसिंग यांच्यासारखा मूळचा नोकरशहा असलेल्याला दहा वर्षे पंत प्रधानपद दिले होते हेही विसरून चालणार नाही. नोकरशहांकडून राजकीयदृष्टय़ा कोणताच धोका नेतेमंडळींना नसतो. बाबू मंडळी ही निरुपद्रवी जमात समजली जाते. त्यांच्याकडून कोणतीही कामे करून घेऊ शकतात असा राजकीय वर्तुळात समज आहे. एकीकडे देशातील बेकारीने विक्रम गाठला आहे आणि तरुणाईला कोणी दीपस्तंभच दिसत नाही त्यावेळेला मोदी मंत्रिमंडळात बाबू मंडळींची जबर चांदी होत आहे हाही एक प्रकारे विक्रमच. एकीकडे बेकारी आणि महागाई वाढत आहे, पेट्रोलच्या किमतीने शतक पार केले आहे असे असले तरी दुसरीकडे सेन्सेक्स देखील वाढत आहे असे विचित्र चित्र आहे. गमतीची गोष्ट म्हणजे दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेला शेतकऱयांचा सत्याग्रह गेली 9 महिने सुरू आहे हाही विक्रमच. ‘मी एका हाकेवर आहे’ असे पंतप्रधानांनी सांगून तीन महिने उलटले तरी अजून फोन लागत नाही आहे हाही एक विक्रमच म्हणावयाचा. आता सुरू होणाऱया संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वादग्रस्त तीन कृषी विधेयकाच्या विरोधात संसदेला साकडे घालण्यासाठी बळीराजा येऊ पाहतो आहे त्यामुळे अगोदरच कोविड महामारीने पिडलेल्या दिल्ली पोलिसांची हालत खराब झाली आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत त्यावेळी कोणते नवीन विक्रम देशाचे खेळाडू प्रस्थापित करणार याकडे साऱया देशाचे लक्ष लागून राहणार आहे पण देशात एक वेगळाच खेळ करायचा आहे काय याची चिंता विरोधी पक्षांमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांना बंगालच्या मुख्यमंत्रीपदी राहण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत निवडून यायचे आहे पण अजून या पोटनिवडणुका जाहीरच होत नाहीत. त्यामुळे ममतांना सत्तेबाहेर ठेवायचा ‘खेळ’ सुरू झाला आहे अशी शंका आणि भीती तृणमूलमध्ये वाढली आहे. विरोधी पक्षांच्या मनातदेखील शंकेची पाल चुकचुकत आहे. सरदार पटेल यांचा एक अतिशय भव्य पुतळा या सरकारने गुजरातमध्ये बनवला हाही विक्रम. गुजरातसह देशभरात चार लाखाहून अधिक लोकांचा कोविड महामारीत मृत्यू हा देखील 70 वर्षातील उच्चांकच. तिसरी लाट येणार या भीतीने देश अर्धमेला झाला असताना भाजपचे उत्तर प्रदेश परत जिंकण्यासाठी वेगळेच राजकारण सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशात 2,000 हून जास्त प्रेते गंगेत फेकून देण्यात आली हे गेल्या महिन्या-दोन महिन्यात दिसून आल्यावर सर्व देशात क्षोभ उडाला होता. दिल्लीतील एका राष्ट्रीय वर्तमानपत्राने मोदींच्या नवीन मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांविरुद्ध गुन्हय़ांच्या तक्रारी (क्रिमिनल केसेस) दाखल झाल्या आहेत आणि या मंत्र्यांपैकी 90 टक्के करोडपती आहेत अशी बातमी दिली होती पण आपल्या वेबसाईटवरून त्यांनी काहीही कारण न देता अलगदपणे काढून टाकली असा गौप्यस्फोट प्रसारमाध्यमांवर बारीक नजर ठेवणाऱया एका संकेतस्थळाने केला आहे. जो कोणी सत्ताधारी असेल त्याला खुश ठेवण्याची या राष्ट्रीय वृत्तपत्राची जुनी खोड आहे असे चिमटे घेण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमांना आपल्या कह्यात ठेवण्याचा एक विक्रमच या सरकारने स्थापित केलेला आहे.
सुनील गाताडे