भाजप गोटात सुरू असलेल्या कुजबुजीनुसार डोवाल, जनरल रावत आणि जयशंकर यांच्यावर मोदींची खफा मर्जी झालेली आहे.
चीनच्या घुसखोरीने देशाच्या सीमा तापू लागल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन संकटमोचक फारसे दिसत नाहीत. सध्याच्या नाजूक वेळी मोदी यांचे खासमखास राहिलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पंतप्रधानांनी जातीने बनवलेले देशाचे पहिले चीफ ऑफ स्टाफ जनरल बिपीन रावत आणि गेल्या वषी त्यांनी नेमलेले नवीन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे फारसे सक्रिय दिसत नसल्याने राजधानीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना ऊत आला नसता तरच नवल होते.
डोवाल हे तर मोदींच्या पहिल्या सरकारात एवढे वजनदार होते की ते सरकार अडीच जणच चालवायचे असे म्हटले जायचे. ते अडीच म्हणजे पंतप्रधान आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा हे दोघे आणि उरलेला ‘अर्धा’ म्हणजे डोवाल. शहा त्या सरकारात मंत्री नसले तरी कोणत्याही मंत्र्यापेक्षा जास्त पॉवरफुल होते आणि सरकारात नसले तरी कोणत्याही मंत्र्याला ते ऑर्डर करू शकायचे असे म्हटले जायचे. डोवाल यांचा दर्जा तेव्हा एका राज्यमंत्र्याचा असला तरी संरक्षण, गृह आणि परराष्ट्र खात्यात त्यांच्या संमतीविना मोठे निर्णय घेणे अशक्मय होते अशी चर्चा होती. या मंत्रालयांमध्ये ते पीएमओचे प्रतिनिधी मानले जायचे. त्यावेळी मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यापूर्वी दक्षिण आशियातील सर्व राष्ट्रप्रमुख मंडळींना त्या सोहळय़ाला बोलावण्याची शक्कल खुद्द डोवाल यांची. महत्त्वाकांक्षी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून डोवाल त्यांचे सल्लागार होते. डोवाल हे गेली सहा वर्षे मोदी सरकारातील बडे प्रस्थ राहिलेले आहेत. दुसऱयांदा पंतप्रधान झाल्यावर मोदीनी डोवाल याना कॅबिनेट दर्जा बहाल करून ते आपल्या किती जवळचे आहेत असा साफ संकेत दिला होता. राष्ट्रीय सुरक्षा अथवा परराष्ट्रासंबंधी कोणताही महत्त्वाचा निर्णय असो त्यात डोवाल यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. पाकिस्तानबरोबर बँकॉक येथे गुप्त वार्ता असो अथवा चीनबरोबर सीमावादाविषयी बोलणी असोत अथवा सुरक्षेसंबंधी कोणताही मोठा प्रश्न असो, डोवालसाहेब नेहमी पुढे असायचे आणि दिसायचे. अथवा नंतर बातम्या यायच्या की मोदींच्या या ‘स्पायमास्टर’ने कसा छक्का मारला आणि देशाच्या दुष्मनांना नामोहरम केले. पाच महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीनंतर वातावरण शांत करण्यासाठी डोवालसाहेब गल्ली गल्लीतून हिंडले होते. असे हाय प्रोफाईल डोवाल गेल्या महिनाभरात कोठे आहेत हे समजायला मार्ग नाही. ना त्यांचा कोठे फोटो आला आहे ना ते कोणत्या उच्चस्तरीय बैठकीला हजार होते अशी बातमी आली आहे
थोडय़ाफार प्रमाणात असेच काहीसे चित्र जनरल रावत यांच्याबाबत दिसत आहे. चीनबरोबरील सीमा तापू लागल्यावर भारतीय सैन्याचे प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनीच प्रामुख्याने सरकारबरोबरील उच्चस्तरीय बैठकीत भाग घेतला असे सांगितले गेले आणि दाखवले गेले. जनरल रावत हे बोलघेवडे आहेत. भारताचे सामर्थ्य एवढे आहे की एकावेळी चीन आणि पाकिस्तानला अंगावर घेण्याची ताकद त्याच्यात आहे असे सांगितले होते.
उच्च लष्करी अधिकारी फार तोलूनमापून बोलत असतात पण रावत याबाबत थोडे तोकडे पडले आणि त्यामुळे कधी कधी वादात अडकले. मवाळ प्रवृत्तीचे जयशंकर हे निवृत्त परराष्ट्र सचिव. चीनमध्ये राजदूत म्हणूनदेखील त्यांनी काम केलेले असल्याने मोदींनी त्यांची सुषमा स्वराज यांच्या जागी परराष्ट्र मंत्री म्हणून गेल्या वषी नेमणूक केली.
जयशंकर यांनी चीनच्या घुसखोरीबाबत केलेली विधाने आता सरकारला अडचणीची ठरली आहेत. विरोधी पक्षांनी त्याबाबत सरकारला धारेवर धरले आहे. जात्याचेच डिप्लोमॅट असल्याने जयशंकर सध्या शांत आहेत. ‘मौनम सर्वार्थ साधनम’ म्हणतात ना त्याप्रमाणे. कितपत खरे अथवा खोटे हे काळच दाखवेल पण भाजप गोटात सुरू असलेल्या कुजबुजीनुसार डोवाल, जनरल रावत आणि जयशंकर यांच्यावर मोदींची खफा मर्जी झालेली आहे. चीनच्या संकटाबाबत त्यांनी पंतप्रधानांची दिशाभूल केली. चीन कोणतेही आततायी कृत्य करणार नाही आणि वेगवेगळया रीतीने आपण परिस्थिती निवाळू शकू अशा प्रकारचे चित्र मोदींपुढे उभे केले होते. गलवान खोऱयात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या झडपीमध्ये 20 भारतीय जवानांचा झालेला मृत्यू हा मोदी सरकारकरता मोठा झटका ठरला. चीनशी आता दोन हात विविध क्षेत्रात कसे करावयाचे याचा जबर खल सरकारी वर्तुळात सुरू झाला आहे. अशा कसोटीच्या क्षणाला सैन्यदलामध्ये आणि संरक्षण वर्तुळात मनोहर पर्रीकर यांची फार आठवण होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांचे नेतृत्व कशाप्रकारचे आहे हे त्यातून प्रतीत होत आहे.
सुनील गाताडे