काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्वतःचे आणि पक्षाची सर्व अकाऊंट ब्लॉक केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर निशाणा साधला आहे. एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ट्विटर हे तटस्थ व्यासपीठ नसून पक्षपाती व्यासपीठ आहे. ते विद्यमान सरकारचेच म्हणणे ऐकत असून मोदींच्या तालावरच डोलत असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला.
आपले अधिकृत ट्विटर हँडल, तसेच पक्षनेते व कार्यकर्त्यांची ट्विटर खाती ट्विटर या मायक्रोब्लॉसिंग साईटने तात्पुरती बंद केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. पण, ही कारवाई आपल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे करण्यात आल्याचे सांगून ट्विटरने आपल्या कृतीचे समर्थन केले होते. यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला आहे. हा राहुल गांधींवर हल्ला नाही. हा फक्त माझा आवाज बंद करण्यापुरते नाही तर लाखो आणि करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.