तूतीकोरिन
केंद्रात भाजपच्या शासनकाळात श्रीमंत अन् गरिबांमधील दरी अधिकच वाढल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला आहे. प्रचाराच्या अंतर्गत दक्षिण तामिळनाडूच्या दौऱयावर असलेल्या राहुल यांनी मीठागरातील कामगारांशी संवाद साधला आहे. कामगारांनी आरोग्यासह अन्य समस्या मांडल्यावर राहुल यांनी तुमच्यासोबत उभा असल्याचे त्यांना उद्देशून म्हटले आहे. एका महिलेने वर्षातील 4 महिन्यांसाठी सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी केली. वर्षातील 4 महिने काम नसल्याचे महिलेने म्हटले आहे. यावर राहुल यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआकडे अशा मुद्दय़ांना हाताळण्याचा कार्यक्रम होता, असा दावा केला आहे. काही लोक तर अत्यंत श्रीमंत होत चालले आहेत, तर अनेक जण गरीब होत आहेत. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यावर ही स्थिती अधिकच वाढली आहे. देशातील प्रत्येक गरीब कुटुंबासाठी किमान उत्पन्नाच्या (न्याय) योजनेमागे काम नसलेल्या कालावधीत लोकांच्या हिताचे रक्षण करण्याची धारणा होती असे राहुल म्हणाले. कुठलेही राज्य, भाषा किंवा धर्म असला तरीही लाभार्थींना दरवर्षी बँक खात्यात 72,000 रुपये मिळाले असते. केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यावर न्याय योजना लागू करण्यात येणार असल्याचे राहुल म्हणाले.