नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १० राज्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र, छत्तीसगड, हरयाणा, केरळ, ओडिशा, पुदुच्चेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील जिल्हाधिकारी आणि फिल्ड अधिकारी पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील सहभागी झाल्या होत्या. मात्र, या बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. याबद्दल ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर नााराजी व्यक्त केली आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना पुतळ्यासारखं बसवून ठेवलं. बोलण्याची संधी देखील दिली नाही, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. यासोबतच या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ऑक्सिजन आणि ब्लॅक फंगस समस्येसंदर्भात कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. तसंच त्यांनी लसीकरणा संदर्भातही आमच्याकडे विचारणा केली नाही. त्यांची ही वागणूक अपमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितलं.
ममता बनर्जी पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढे घाबरलेले आहेत की त्यांना मुख्यमंत्र्यांचे ऐकूनच घ्यायचे नाही. असे जर असेल तर मग मुख्यमंत्र्यांना या बैठकीला का बोलवले, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.