नवी दिल्ली/प्रतिनिधी
काँग्रेस आमदाराने नोटामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्याची मागणी केली असून यासाठी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलंय आणि आपली मागणी मान्य करण्याची विनंती केली आहे. त्याची ही मागणी सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेस आमदाराने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मागणी केलीय की, पाचशे आणि दोन हजारच्या नोटांवरुन महात्मा गांधीचं चित्र काढून टाकलं जावं. नोटांवर महात्मा गांधींचं चित्र नको. पाचशे आणि दोन हजारच्या नोटांचा वापर हा भ्रष्टाचारामध्ये तसेच बारमध्ये केला जातो. त्यामुळे गांधींचा फोटो नोटांवर नको, अशी या आमदाराची मागणी आहे.
दरम्यान, ५०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटांवर मोदींनी स्वत:चा फोटो लावावा, आणि त्याखाली न खाऊंगा, न खाने दुंगा हा संदेश लिहावा, असा सल्लाही भरत सिंह कुंदनपूर यांनी या पत्रातून दिला. ते म्हणाले की, असे केल्याने भ्रष्टाचार थांबेल. भ्रष्टाचारी नोटा घ्यायला घाबरतील. भ्रष्टाचाऱ्यांमध्ये मोदींनी दिलेल्या इशाऱ्याची भीती असेल. ते चमकतील. कारण मोदींना नोटाबंदीचा पुरेपूर अभ्यास आहे.
गेल्या साडेसात दशकांमध्ये देश आणि समाजात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी एसीबी विभाग आहे.
तो आपले काम करत आहे. राजस्थानमध्ये जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२० या काळात ६१६ ट्रॅप पकडण्यात आले. म्हणजेच राज्यात दररोज सरासरी दोन ट्रॅप लावण्यात आले. ही रक्कम रोख स्वरूपात घेतली जाते. यासाठी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा वापरल्या जातात. त्यावर गांधीजींचं चित्र असतं. त्यामुळे गांधीजींचा अपमान होतो. त्यामुळे गांधीचींचा फोटो हा ५, १०, २०, ५०, १०० आणि २०० रुपयांच्या नोटांवर छापला जावा. या नोटा गरीबांना उपयोगी पडतात. तसेच गांधीजींनीही गरिबांसाठी काम केले होते, असे त्यांनी सांगितले.