भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे 1962 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना चीनच्या आक्रमणाने निष्प्रभ केले होते तसेच मोदी यांचे नेतृत्व कुचकामी करण्यासाठी शी जीन पिंग यांनी ही घुसखोरी सुरू केली आहे.
नरेंद्र मोदी हे भारताच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानांपैकी सर्वात दबंग पंतप्रधान आहेत. आतापर्यंत झालेल्या पंतप्रधानांमध्ये जेवढा आत्मविश्वास, कल्पकता, आक्रमकता नव्हती तेवढी त्यांच्यात आहे असे त्यांचे प्रशंसक म्हणतात. ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ असे त्यांचे कर्तृत्व आहे असे त्यांना वाटते. आता या परिस्थितीत या साऱया गुणांचा वापर करून त्यांनी चीनला चारी मुंडय़ा चित करावे. इतिहासात त्यांनी नाव कमवावे असा दबाव सर्वांकडून, विशेषतः त्यांच्या चाहत्यांकडून येत आहे. त्यांना मोदी निराश करणार काय हे येत्या काळात दिसणार आहे.
विरोधकांचा पालापाचोळा
2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणाऱया नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला निशाणा केले होते. काँग्रेस सरकारे चीन समोर मांजराप्रमाणे मऊ राहिली त्यामुळे त्याची शिरजोरी वाढली. आपण चीनला ‘लाल आंख’ दाखवू, त्यावर डोळे वटारू आणि त्याची दादागिरी चालू देणार नाही अशा पद्धतीची आश्वासने देऊन त्यांनी सत्ता मिळवली. मे 16, 2014 हा भाजप करता सुवर्णाक्षरानी लिहिला गेलेला दिवस निघाला कारण त्यादिवशी या राष्ट्रीय पक्षाला पहिल्यादा स्वबळावर मोदींनी बहुमत मिळवून दिले.
‘सब कुछ मोदी’ असलेल्या या निवडणुकीपासून काँग्रेससह साऱया विरोधकांचा पालापाचोळा झालेला आहे. राहुल गांधी म्हणजे ‘पप्पू’च आहेत असे वारंवार मोदी प्रशंसकांनी अधोरेखित केले आहे. मोदींच्या सरकारात ‘सब कुछ मोदी’ असाच बराचसा प्रकार असल्याने इतर नाकर्ते मंत्री ‘लडने को बडे भाई, हम कपडे संभालते है’ अशी भूमिका घेतात असे मात्र जरूर दिसत आहे. गेल्या वषी संरक्षण मंत्री म्हणून नेमल्या गेलेल्या राजनाथसिंग यांचा वकूब फारसा नाही हे पहिल्यापासूनच दिसत होते. गेल्या एप्रिलपासून चीनने सुरू केलेल्या लडाखमधील घुसखोरीनंतर तर राजनाथसिंग यांच्या मर्यादा जास्तच स्पष्ट झाल्या आहेत. गमतीची गोष्ट अशी की चीनबरोबर एवढे भांडण विकोपाला गेले असताना मोदींचे खासमखास समजले जाणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे नावच कोठे ऐकू येत नाही. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या सैन्यदलातील सर्वोच्च पदावर मोदींनी नेमलेल्या जनरल बिपीन रावत आणि परराष्ट्र मंत्री म्हणून नेमलेले माजी विदेश सचिव एस. जयशंकर यांची प्रतिमा एका निवृत्त बाबूपेक्षा वेगळी नाही. सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांची उणीव सध्या दिसून येत आहे हे खरे पण याची सर्व उणीव मोदी भरून काढतील अशी त्यांच्या अगणित चाहत्यांची अपेक्षा आहे. ‘सवा लाख से एक लडाऊ’ असे त्यांचे नेतृत्व मानले जात आहे. मोदींची अपार राष्ट्रभक्ती, संन्यस्त वृत्ती, कौटुंबिक पाशाचा त्याग, आणि जीवन राष्ट्राला अर्पण करण्याचा जजबा बघितला तर चीनला तेच वठणीवर आणू शकतात अशी भावना वाढीस लागली नसती तरच नवल होते. त्यांनी असे केले तर स्वातंत्रोत्तर भारतातील ते सर्वात मोठे, कणखर पंतप्रधान म्हणून नाव कमवू शकतात.
म्हणे फक्त एक कावळा मेला
गेल्या वषी पाकिस्तानच्या बालाकोट येथे भारतीय हवाई दलांच्या विमानांनी हल्ला करून तेथे असणाऱया दहशतवाद्यांच्या छावणीला उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी स्फोटाने 44 अर्धसैनिक दलाचे जवान मारले गेले होते त्यानंतर ही कारवाई झाली होती. या कारवाईत अडीचशे-तीनशे दहशतवाद्यांना यमसदनास पाठवण्यात आले असे दावे येथे केले गेले. पाकिस्तानने मात्र या कारवाईत फक्त एक कावळा मेला असे सांगितले होते. त्या अगोदर झालेल्या उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने पाकला बेसावध क्षणी पकडले. ‘घर मे घुस के मारेंगे’ असे मोदींचे कणखर नेतृत्व आहे असा डंका तेव्हा पिटवला गेला. बालाकोटनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यामुळे मोदींनी विरोधी पक्षांना लीलया धूळ चारली. तात्पर्य काय मोदींनी राष्ट्राचा मूड बरोबर पकडला आणि ते लोकप्रियतेच्या दुसऱया लाटेवर परत स्वार
झाले.
चीनला जबर दणका द्याच
उत्तरी कमांडचे प्रमुख राहिलेले जनरल (सेवानिवृत्त) ह स पनाग यांनी मोदी सरकार तसेच देशाच्या लष्करी नेतृत्वाचे हात 20 सैनिकांच्या रक्ताने बरबटलेले आहेत असा आरोप करून चीनला धडा शिकविल्याशिवाय भारताला आता तरणोपाय राहिलेला नाही असे ठासून सांगितले आहे.
जनरल जे. जे. सिंग यांच्यासह बऱयाच माजी सैन्य प्रमुखांनी देखील विश्वासघाती चीनला अद्दल घडवल्याशिवाय तो ताळय़ावर येणार नाही असे सूचित केले आहे.
चीनला पहिला एक जबर दणका दिला पाहिजे आणि मगच बोलण्याचे गुऱहाळ लावले पाहिजे अशी भूमिका त्यांनी सर्वसाधारणपणे घेतलेली आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे 1962 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना चीनच्या आक्रमणाने निष्प्रभ केले होते तसेच मोदी यांचे नेतृत्व कुचकामी करण्यासाठी शी जीन पिंग यांनी ही घुसखोरी सुरू केली आहे.
सुनील गाताडे