नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी, एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या पीडित कुटुंबासोबतचा फोटो ट्विट करून त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्रं लिहिलं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधींनी पीडित कुटुंबाचा ट्विटरवर फोटो ठेवणं हा गुन्हा आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांननी मीडियाशी बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांनी मृत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक फोटो टाकला आहे. तो फोटो काढावा यासाठी राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटरल इंडियाला पत्र लिहिलं आहे. हा काय प्रकार आहे. हि तर हुकुमशाही झाली. तुम्ही त्या कुटुंबाचे सांत्वन करत आहेत याबाबतची माहिती देशाच्या जनतेला दिली तर अशा प्रकारे गळचेपी करत आहात का? नरेंद्र मोदी हे निर्भयाच्या कुटुंबाला भेटायला गेले होते. तेव्हा अनेक फोटो प्रसिद्ध झाले होते. तेव्हा ते फोटो काढा अस बाल संरक्षण आयोगाने लिहिल्याचे आठवत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
दिल्लीत एका ९ वर्षीय दलीत मुलीवर बलात्कार झाला हा अत्यंत गंभीर विषय आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो. आणि विरोधी पक्षातीस सर्व नेते पिडीतेच्या कुटुंबीयांच्या भेटीला जातात हे सुद्धा केंद्र सरकारला आवडलेलं नाही आहे. भाजपने यावर प्रतिक्रिया दिली आहे. या बलात्काराच्या बाबत भाजपकडून असे उत्तर आलंय की काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होत नाही का? म्हणजे काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होत असतील तर तुमच्या राज्यातील बलात्कार माफ करायचे का?, असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित करण्यात आला.
या देशात लोकशाही, संसदीय लोकशाही, संसद या संस्था आम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत. तुम्ही शेतकऱ्यांवर बोलायला तयार नाही, महागाईवर बोलायला तयार नाही, हेरगिरीवर बोलायला तयार नाही. मग केंद्र सरकार कोणत्या विषयावर बोलायला तयार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करावी ही अपेक्षा असेल तर ते चालणार नाही. विरोधी पक्षाने सरकारने हातात घालून देशाचे काम करावं अशी आमची भूमिका आहे. अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचे आहे. विशेषता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर पेगॅसस हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.