मुंबई प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राविषयी तसंच काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातून अनेक मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवल्याने कोरोनाचा प्रसार झाला, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. याविरोधात आता महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाली असून आज आंदोलन करण्यात येत आहे.जोवर मोदी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील,असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मंत्रालयासमोर हे आंदोलन सुरूआहे. पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचंही पटोले यांनी सांगितलं आहे. तसंच राज्यभरातल्या भाजपा कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. तसेच “महाराष्ट्र हे देशात कोरोना वाढवणारं राज्य आहे. ज्या राज्याने इथल्या जनतेने मदत करण्याचं काम केलं, त्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार मोदींना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही.असंही नाना पटोले म्हणाले आहेत.