प्रतिमा सुधारण्याच्या रणनीतिवर चर्चा – आगामी काळात मोठय़ा बदलांची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिंतेत आहे. याचवरून संघाने एक बैठक घेतली असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा सामील झाले आहेत. बैठकीत उत्तर प्रदेशातील कोरोनाचा प्रभाव आणि याच्या निवडणुकीवर होणाऱया परिणामावरून चर्चा करण्यात आली आहे.
दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर पक्ष आणि संघटन स्तरावर मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. उत्तरप्रदेशात होणाऱया निवडणुकीपूर्वी पक्षाच्या प्रतिमेला पोहोचलेल्या नुकसानाची भरपाई करण्याचा प्रयत्न यातून होऊ शकतो. या बैठकीत संघाचे दत्तात्रेय होसबाळे, उत्तरप्रदेशातील संघटनेचे प्रमुख सुनील बन्सल देखील सामील झाले होते. कोरोनामुळे लोकांमध्ये भाजपविषयी तयार झालेल्या प्रतिमेबद्दल गंभीर चिंता या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे समजते.
कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान मोदींवर होत असलेल्या थेट हल्ल्यांमुळे भाजप त्रस्त आहे. दुसऱया लाटेमुळे देशाची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. आरोग्य सेवांसंबंधी सरकारच्या तयारीतील त्रुटी ठळकपणे समोर आल्या आहेत. याचबरोबर लस, ऑक्सिजन, बेड आणि औषधांच्या तुटवडय़ामुळे तयारीतील ढिसाळपणा उघड झाला आहे.
योगी सरकारच्या प्रतिमेला धक्का
उत्तरप्रदेश कोरोनाने सर्वाधिक प्रभावित होणाऱया राज्यांमध्ये सामील आहे. गंगा नदीत वाहणाऱया प्रेतांनी राज्याती होणाऱया मृत्यूंचे सत्य सर्वांसमोर आणले आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यावरून योगी सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत. उत्तरप्रदेशातील चाचण्या आणि रुग्णांचे आकडे खरे आहेत का असा प्रश्नही विचारला जात आहे.
कोरोना प्रभावितांना मदतीचे आवाहन
भाजप अध्यक्ष नड्डा यांनी मागील आठवडय़ात भाजपशासित राज्यांना एक पत्र पाठविले आहे. 30 मे रोजी मोदींच्या कार्यकाळाला 7 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कुठलेच आयोजन न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केले आहे. कार्यकर्त्यांनी त्या दिवशी समाजसेवेचे कार्य करावे. कोरोनामुळे स्वतःच्या आईवडिलांना गमावलेल्या मुलांना मदत करा, अशा मुलांचे उत्तम भविष्य सुनिश्चित करा. ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. रुग्णालयांमध्ये बेड, औषधे आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासही मदत करा असे नड्डा यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे. मोदी सरकारला 7 वर्षे झाल्यानिमित्त भाजपशासित राज्यांमध्ये विशेष योजना सादर केली जाण्याची शक्यता आहे.
ए.के. शर्मा यांना उपमुख्यमंत्रिपद?
पंतप्रधान मोदींच्या मर्जीतील माजी आयएएस अधिकारी आणि आमदार ए.के. शर्मा यांना उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्रिपदी नियुक्त केले जाणार असल्याची चर्चा आहे. पूर्वांचल आणि वाराणसीत शर्मा यांच्या कोविड व्यवस्थापनाचे मोदींनीच कौतुक केले होते. राज्यात दोन का तीन उपमुख्यमंत्री असावेत यावर सध्या विचारविनिमय सुरू आहे. चालू महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो. या विस्तारावर 5 नवे चेहरे सामील केले जातील तर 7 जणांना मंत्रिपदावरून हटविले जाऊ शकते.