ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहून ट्विटर सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी फॉलोअर्स वाढू नयेत म्हणून मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरला एक पत्र लिहिलंय.
दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे, की ट्विटर हा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म भारत सरकारच्या दबावाखाली त्यांचे नवीन फॉलोअर्स वाढू देत नाही. ते फॉलोअर्स मर्यादित करण्याचा प्रयत्न करतंय. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांचं ट्विटर अकाउंट लॉक झाल्यापासून त्यांचे फॉलोअर्स होते तेवढेच असून त्यामध्ये वाढ झालेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी यासंदर्भात २७ डिसेंबर रोजी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिलं असून ते मोदी सरकारच्या दबावाखाली काम करतअसल्याचा आरोप केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी ट्विटरला काही तपशीलवार माहिती पाठवली आहे. त्यातून त्यांनी निदर्शनास आणून दिले की पूर्वी दरमहा सरासरी २.३ लाखांहून अधिक नवीन फॉलोअर्स वाढत होते. काही महिन्यांमध्ये तो आकडा वाढून ६.५ लाखांपर्यंत गेला होता. परंतु ऑगस्ट २०२१ पासून, म्हणजेच अकाउंट अनलॉक झाल्यापासून त्यांचे महिन्याला केवळ २५०० फॉलोअर्स वाढत आहेत. ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंत आपले १ कोटी ९५ लाख फॉलोअर्स कमी केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.