प्रतिनिधी/ सातारा
केंद्र सरकारने इंधनासह घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून स्वयंपाक करत मोदी सरकारचा निषेध नेंदविला. तसेच भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, पश्चिम महाराष्ट्र निरिक्षक भारती शेवाळे, युवती सेल जिल्हाध्यक्षा पुजा काळे, कुसुमताई भोसले, रूपाली भिसे, उषा जाधव, उषा पाटील, रशिदा शेख, रूपाली भिसे, निता शिंदे, सुजाता बावडेकर, शुभांगी निकम, डॉ. सुनिता शिंदे, प्रभावती बेंद्रे यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी मोदी सरकार हाय हाय, या केंद्र सरकारचे करायचे काय ? खाली मुंडी वर पाय, राष्ट्रवादी कॉगेस पक्षाचा विजय असो, नहीं चाहिए तुम्हारे अच्छे दिन, लौटा दो हमे हमारे बुरे दिन, मोदी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी महिलांनी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, वाढलेले इंधनाचे दर व गॅसची दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे. घरगुती गॅसच्या दरात मोठी वाढ झाली असून प्रति सिलिंडर 25 रूपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. वारंवार इंधन व गॅसची दरवाढ करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम होत आहे.
त्यामुळे गॅस दरवाढ तातडीने मागे घ्यावी. गॅस सिलिंडरची दरवाढ होत राहिल्यास महिलांना पुन्हा एकदा चूल पेटवावी लागेल. तसेच शासनाने रॉकेलही बंद केल्याने सर्वसामान्यांची अडचण झाली आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी रॉकेल उपलब्ध करावे. तसेच इंधनासह गॅसची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी महिलांनी दिला.