ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मोदी सरकारने आपल्या लोकशाहीच्या प्रमुख संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगासस स्पायवेअर खरेदी केलं होतं. फोन टॅप करून सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष, सैन्य, न्यायपालिका सर्वांना लक्ष्य केलं आहे. हा मोदी सरकारचा देशद्रोह आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
पेगासस डीलबाबत न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टने मोठा धमाका केला आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या असून या संपूर्ण प्रकरणात पीएमओने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीच करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी या प्रकरणावर ट्विट करत म्हटले आहे की, मोदी सरकारने हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली. यात राजकीय नेते, सामान्य नागरिक, लोकशाहीचा आधार असलेल्या संस्था या सर्वांचीच हेरगिरी करण्यात आली. फोन टॅप करून सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, लष्कर, न्यायपालिका यांना लक्ष्य करण्यात आलं. हा मोदी सरकारने केलेला देशद्रोह आहे.
तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी ‘चौकीदारच हेर आहे हे आता सिद्ध झाले आहे. बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण भटकत होते तेव्हा, लाठय़ांचा मार खात होते तेव्हा आपले पंतप्रधान पेगासस खरेदी करण्यात आणि हेरगिरीची आखणी करण्यात मग्न होते. हे सर्व लक्षत ठेवलं जाईल’, अशा शब्दांत निशाणा साधला.