कृषी कायद्याला विरोध, शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्याची मागणी
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले निवेदन
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
केंद्र सरकारने नवीन कृषी विधेयक लागू केल्यामुळे देशभरात आंदोलन होत आहे. दरम्यान या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. या बंदला वंचित बहुजन आघाडी यांनी पाठिंबा दिला असून मोदी सरकार, जिल्हा प्रशासनास भाजीपाला, कांदा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी विरोधी कायदा मागे घेणे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मंगळवारी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वंचित च्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी हातात झेंडे, भाजीपाला, कांदा हाती घेतला होता. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. भाजप सरकारचा निषेध असो, शेतकरी विरोधी कायदा मागे घ्या, वंचित बहुजन आघाडी चा विजय असो अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज मंगळवारी बंदमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही उभारलो आहोत. देशात शेतकऱ्यांचे हाल होत आहे, जनता मोदी सरकारच्या विरोधात असतानाही मोदी सरकार जागे होत नाही. कृषी कायदा रद्द न केल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार असल्याचा इशारा आनंद चंदनशिवे यांनी दिला. लवकरात लवकर कृषी कायदा मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.
नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगुंडे, महाराष्ट्र प्रदेश अंजना गायकवाड, बबलू शिंदे नाना कदम यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.