सोलापुरात पोलिसांच्या दडपशाहीला झुगारत कामगारांनी केला देशव्यापी संप यशस्वी !
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
देशातील प्रमुख मध्यवर्ती कामगार संघटना एकत्र येऊन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने शासकीय, निमशासकीय, संघटीत, असंघटीत, खाजगी क्षेत्रातील कामगार, कर्मचारी यांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्या, प्रलंबित प्रश्न आणि कामगार कायद्यातील प्रतिगामी बदलाच्या विरोधात सार्वत्रिक देशव्यापी संपाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापुरात ज्येष्ठ कामगार नेते कॉ. नरसय्या आडम (मास्तर) आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी दत्त नगर, लाल बावटा कार्यालय येथून १५ हजार कामगारांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकार हमसे डरती है, इसलिये पोलीस को आगे करती है, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सदर मोर्चा आंध्रदत्त चौक, पद्मशाली चौक, जिंदाशहा मदार चौक, किडवाई चौक, बेगमपेठ पोलीस चौकी, जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या मार्गावर मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चात मागण्यांचे फलक, झेंडे, गगनभेदी आवाजात घोषणा देत शेकडो पोलिसांचा फौजफाटा आणि दडपशाहीला तोंड देत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
आडम म्हणाले, कामगार विरोधी प्रतिगामी बदल करून पुन्हा एकदा देशामध्ये गुलामगिरीची नांदी आणू पाहत आहे. कारण या देशातून कामगार ही संकल्पना समूह नष्ट करण्याचा कुटील डाव सरकारने रचलेला आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशातील २ कोटी कामगार, कर्मचारी स्वतःची रोजीरोटी गमावून बसले आहेत. बेरोजगारांच्या हाताला सरकार काम देत नाही. खाजगी व कॉर्पोरेट कंपन्या मनमानी करून कोट्यावधी कामगारांना रस्त्यावर फेकले. कामगार कायद्यांना नख लावून सरकार काय साध्य करणार? असा सवाल कॉ. आडम यांनी केले. कामगार-कर्मचारी विरोधी असणाऱ्या काळ्या कायद्याची कदापिही अंमलबजावणी होऊ देणार नाही. जे कायदे रक्त सांडून मिळविलेले आहेत. ते अबाधित राखण्यासाठी पुन्हा रक्त सांडण्याची कामगारांची तयारी आहे. अशी आगपाखड केंद्र सरकारच्या धोरणावर करण्यात आली.
ते पुढे बोलताना म्हणाले कि, कॉ. गोदुताई परुळेकर वसाहतीतून जवळजवळ १८ हजार महिला विडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटीत कामगार उत्स्फुर्तपणे संपात सहभागी होत असताना तिथल्या पोलीस प्रशासनाने पहाटे ६ वाजल्यापासून संपूर्ण वसाहतीत संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण करून पोलिसांनी दडपशाही केली. लोकांची वाहने जप्त केली. वाहतुकीस अडथळा निर्माण केला, घरातून बाहेर येण्यास मज्जाव केला, तरीही लोक पोलिसांना चकवा देत संपात सहभागी झाले. पोलिसांच्या या दंडेलशाहीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत कोरोना लस लवकरच उपचारात आणणार असल्याची माहिती पुढे येत आहे. तेव्हा सरकार प्रत्येक गरीब कष्टकरी कामगाराला मोफत कोरोना लस दिली पाहिजे आणि देशवासियांचे प्राण वाचवले पाहिजेत. ही सरकारची प्रमुख जबाबदारी आहे. यापासून परावृत्ताची भूमिका सरकार घेत असेल तर सरकारला धडा शिकविण्यासाठी जनता मजबूत आहे. सरकारच्या विरोधातली ही लढाई आगामी काळात आणखीन तीव्र स्वरूप धारण करेल. गनिमीकावा करून सरकारची कोंडी करण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख सभेला संबोधित करताना म्हणाले की, जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरून व्यक्त होत असताना शासन सर्रास डोळेझाक करण्याचा प्रयत्न करत आहे. २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी संपाची सूचना मा. जिल्हाधिकारी यांना कळवूनही त्यांनी पंढरपूरच्या दौऱ्यावर गेले. जिल्हाधिकारी येईपर्यंत मोर्चा हटणार नाही, अशी भूमिका घेताच पोलिसांची तारांबळ उडाली.
यावेळी नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, नगरसेविका कामिनिताई आडम, अशोक इंदापुरे, पुष्पा पाटील, व्यंकटेश कोंगारी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक सुनंदा बल्ला, म.हनीफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे, मुरलीधर सुंचू, विक्रम कलबुर्गी, अकिल शेख, बाबूलाल फणीबंद, शंतनू गायकवाड आदि उपस्थित होते. या आंदोलनाचे प्रास्ताविक युसुफ शेख (मेजर) यांनी केले. तर सूत्रसंचालन कॉ. अनिल वासम यांनी केले.