नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत, तर मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना काँग्रेसने त्यावर जोरदार टीका केली आहे. देशातील महागाई आणि कोरोना कार्यकालातील कामगिरी लक्षात घेता हे गेल्या ७३ वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार आहे असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.
रणदीप सुरजेवाला म्हणाले की, देशात पेट्रोलच्या किंमती शंभरीपार तर तेलाच्या किंमती २०० रुपयांच्या पार गेल्या आहेत. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिंलेडच्या किंमतींनी घरातील गृहिणींचे बजेट कोलमडले. गेल्या सात वर्षांपासून देश हे सहन करत आहे. सात वर्षांतील मोदी सरकारची सर्व काम समोर आली आहेत. आता त्यांची उत्तरे देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या काळात लाखो जण तडफडून आपला जीव गमावत आहेत. स्मशानभूमी आणि कबरीस्थानात मृतदेहांची विल्हेवाट लावायला जागा राहिलेली नाही. मोदी सरकारच्या काळात कोरोना महामारीची भयंकर परिस्थिती असताना ऑक्सिजन,व्हेंटिलेट,रुग्णालय, औषधे कोरोना प्रतिबंधात्मक लस या सगळ्यांचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकार पूर्णपणे गप्प बसलेले आहे. मोदी सरकार चीन सारख्या देशाचेही काही करु शकलेले नाही. भारतीय सीमा भागात चीन करत असलेल्या अतिक्रमणांना मोदी सरकार थांबवू शकले नाही. गेल्या सात वर्षांत मोदी सरकार हे गेल्या ७३ वर्षांतील सर्वात कमजोर सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे,अशी टीका काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.