दत्तप्रसाद नाईक यांच्याकडून स्पष्ट
प्रतिनिधी /पणजी
मी भाजपच्या विरोधात नाही आणि पक्षानेही मला कधीच दूर केले नाही. उलटपक्षी खूप काही दिलेले आहे. मात्र मोन्सेरात यांच्यासाठी कधीच काम करणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे ठाम मत भाजपचे माजी प्रवक्ता तथा ताळगावमधील माजी उमेदवार दत्तप्रसाद नाईक यांनी व्यक्त केले.
प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व नंतर स्वतः ही पक्षाची शिकवण आहे. अशावेळी मोन्सेरात यांचे राष्ट्र बांधणीत योगदान ते काय? असा सवाल दत्तप्रसाद नाईक यांनी उपस्थित केला. अनेक दुष्कृत्ये, लैंगिकतेसारखे गुन्हे, हवाला सारखे आरोप, असलेल्या व्यक्तीस घेऊन ’राष्ट्र प्रथम’ होऊच शकत नाही, असे नाईक म्हणाले.
गत मनपा निवडणुकीवेळी आमच्या काही ज्येष्ठ, निष्ठावान कार्यकर्त्यांच्या प्रभागांची जाणीवपूर्वक फेररचना किंवा राखीव करून अन्याय करण्यात आला होता. त्याशिवाय काहीजणांना तर उमेदवारीच मिळू नये असेही प्रयत्न झाले होते. यामागे बाबूश यांचाच हात होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो होतो.
कितीही नवीन पक्ष आले तरी अन्य कोणत्याही पक्षाचा याक्षणी मी विचार करू शकत नाही. त्याचबरोबर मोन्सेरात यांच्यासाठी ताळगावात आणि पणजीतील लोकांसमोर मनधरणीही करू शकत नाही. यंदा दोन्ही मतदारसंघातून थेट त्यांच्या विरोधात प्रचारात उतरणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
अशावेळी मोन्सेरात यांना टक्कर देण्यासाठी पणजीतील लोकांनी मलाच प्रोत्साहित केले तर मागेही हटणार नाही. या लढाईत दोन्ही उमेदवार एकाच पक्षाचे होत असले तरी त्यासंबंधी योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. कारण निवडणुकीपर्यंत मोन्सेरात स्वतःच भाजपात असतील की नाही, किंवा यावेळी पणजीकर त्यांची उमेदवारी स्वीकारतील की अमान्य करतील, हेही येणाऱया काळात स्पष्ट होणार आहे, असे नाईक म्हणाले.
2012 च्या निवडणुकीत केवळ 1150 मतांच्या फरकाने माझा पराभव झाला होता. तरीही पुढील पाच वर्षे विनाखंड ताळगावात काम सुरूच ठेवले होते. येथील 11 वर्षांपूर्वी सुरू झालेले मलनिस्सारण वाहिनीचे काम मोन्सेरात अद्याप पूर्ण करू शकल्या नाहीत. 90 टक्के काम अपूर्ण आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. या सर्वांचा लेखाजोखा आता पुढील निवडणुकीवेळी लोकांसमोर आणणे गरजेचे आहे. तो आम्ही मांडणार आहोत. त्यानंतर मतदारांना योग्य वाटेल तो निर्णय घेऊद्या, असे नाईक म्हणाले.
भाजप जी जबाबदारी देईल ती पार पाडणार
भाजपने मला कधीच दूर केले नाही, किंवा कोणतेच त्रासही केलेले नाहीत. 2017 मध्ये निवडणूक हरल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी गोवा ईलेक्ट्रॉनिक्सचा अध्यक्ष बनवून लोकसेवा करण्याची चांगली संधी दिली, असे ते म्हणाले. अशावेळी भाजपा जे काम, जबाबदारी देईल ते करण्याची तयारी असेल. मात्र प्रसंगी मोन्सेरात कुटुंबियांच्या विरोधात जाईन, पण त्यांच्यासाठी कदापी वावरणार नाही. असे सांगून दसऱयापासून दोन्ही मतदारसंघात प्रत्यक्ष प्रचारात उतरणार असेही श्री. नाईक म्हणाले.