’आमी पणजेकार’ पॅनलचे आवाहन : सर्व प्रभागातून निवडणूक लढविणार, आपचा पाठिंबा जाहीरनाम्यातून आकर्षक आश्वासने
प्रतिनिधी / पणजी
पणजी मनपात गत 15 ते 20 वर्षे सत्तास्थानी राहिलेल्या गटाचे नेते बाबूश मोन्सेरात यांनी काम कमी आणि राजकारणच जास्त केले व पणजीकरांपेक्षा स्वविकासावरच जास्त भर दिला. अशा नेत्याच्या गटातील उमेदवारांना मते देतांना मतदारांनी सखोल विचार करावा, कितीही आणि कोणतीही आश्वासने दिली तरी त्यावर विश्वास ठेऊ नये, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे नेते वाल्मिकी नाईक केले. भाजप हा सध्या ’बाबूश जेनिफर पक्ष’ बनला असल्याची टीकाही त्यांनी केली.
सुरेंद्र फुर्तादो यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर या पॅनलमधील रेखा कांदे, ऍड. मलिसा सिमोईश, सुरेश चोपडेकर, सुरेंद्र फुर्तादो, भारती हेबळे आणि रुथ फुर्तादो हे उमेदवार तर उपस्थितांमध्ये उर्वरित सर्व उमेदवार उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पुष्पांजली वाहण्यात आली.
पणजीची स्थिती आज काय आहे ते लपून राहिलेले नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी मतदारांनी ’आमी पणजेकार’ पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन नाईक यांनी केले. सध्या आपल्या पॅनलमधील उमेदवारांना मिळत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहून मोन्सेरात गटातील काही उमेदवार हादरले आहेत. त्यातून नको असलेले आरोप करून बदनामी करण्याचे प्रकार त्यांनी आरंभले आहेत, असा आरोप नाईक यांनी केला.
’आमी पणजेकार’ पॅनलमध्ये अपक्षांसह सर्व पक्षातील उमेदवार आहेत आणि त्यांना आम आदमी पक्षाचाही पाठिंबा असेल असे नाईक यांनी जाहीर केले. ’आमी पणजेकार’ पॅनल स्थापन करण्यामागे मोन्सेरात गटापासून पणजीचा बचाव करणे हा एकमेव उद्देश असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत ’आमी पणजेकार’ पॅनलच्या जाहीरनाम्याचेही प्रकाशन करण्यात आले. सुरेंद्र फुर्तादो यांनी जाहीरनाम्याचे वाचन केला. त्यात प्रामुख्याने पणजीकरांना घरपट्टीत 50 टक्के सूट, शहरात स्थानिकांना मोफत पार्किंग, लहान व्यावसायिकांना साईनबोर्ड लावण्यासाठी मोफत मान्यता, वाहतूक मुक्त पणजी, शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी 24 तास अखंडीत वीज आधारित शहरी बस सेवा, यासारख्या असंख्य आश्वासने देण्यात आली आहेत.
विद्यमान पालिका गटाचे नेते बाबूश मोन्सेरात यांनी पणजीच्या विकासापेक्षा स्वतःच्या विकासावरच जास्त भर दिला. ते स्वतः आमदार बनले, पीडीए अध्यक्षपद मिळविले, पत्नीलाही आमदार बनविले व सध्या मंत्रीपदीही बसविले. उदय मडकईकर यांनाही त्यांनी महापौर बनविले. त्यांच्या या कार्यपद्धतीतून पालिकेची महापालिका बनविण्याचा जो मुख्य हेतू होता तो सफल झालाच नाही. सध्या पणजीचा विकास पूर्णपणे रखडलेला आहे. शहराची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी निवडणूक प्रक्रियेतही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघ फेररचना, राखिवता, मतदार यादी या सर्वात स्वतःचा फायदा पाहूनच मर्जीनुसार बदल करण्यात आले, असे दावे नाईक यांनी केले. हे सर्व चित्र पाहता मतदारांनी विचारपूर्वक मतदान करून आमी पणजेकार पॅनलला पूर्ण बहुमत द्यावे, असे आवाहन फुर्तादो यांनी केले. या पॅनलद्वारे सर्व तीसही प्रभागात उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला असला तरी बहुमतासाठी आवश्यक संख्या आम्ही निश्चित मिळविणार असा ठाम विश्वास फुर्तादो यांनी व्यक्त केला.