सरकारचा 2010 मध्येच निर्णय : कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही,केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री डॉ. व्ही. के. सिंग यांची स्पष्ट ग्वाही
प्रतिनिधी /पणजी
मोप येथील नवीन ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर सध्याचा दाबोळी विमानतळ बंद करण्यात येणार नाही. दोन्ही विमानतळ सुरूच राहतील, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री डॉ. व्ही के सिंग यांनी दिली. त्यासंबंधी जून 2010 मध्येच केंद्र सरकारने निर्णय घेतला होता, असे सांगताना, कुणाचेही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने या दोन्ही विमानतळांवरील वाहतूक व्यवस्थापन करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
बुधवारी पणजीत आयोजित करण्यात आलेल्या कान्सो (नागरी हवाई वाहतूक सेवा संस्था) च्या परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, सीएएनएसओचे महासंचालक सायमन हॉक्वार्ड, सीएएनएसओचे आशिया पॅसिफिक क्षेत्राचे संचालक पोह थेन सोह आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.
दोन्हींवर प्रतिदिन 150 विमाने उतरणार
पुढे बोलताना, मोप प्रारंभ झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी दिवसभरात 150 पेक्षा जास्त विमाने उतरू शकणार आहेत. त्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश असेल, असे सिंग यांनी सांगितले.
मोपमुळे अतिरिक्त कनेक्टिव्हिटी मिळेल
पर्यटनक्षेत्रातील वाढ पहायची असेल तर आम्हाला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. नवीन विमानतळामुळे ही अतिरिक्त कनेक्टिव्हिटी मिळण्यात मदत होईल. आज दाबोळी 20 शहरांशी जोडले गेले असेल तर उर्वरित 20 शहरे मोपाला जातील, असे सिंग म्हणाले.
दाबोळीत विमानांच्या लँडिंगवर मर्यादा
दाबोळीत सध्या रोज सुमारे 70 विमाने उतरतात. मात्र या विमानतळाचे व्यवस्थापन भारतीय नौदलाकडे असल्यामुळे त्यांच्याकडून स्वतःच्या कवायती व अन्य वापरासाठी सकाळी 9 ते दुपारी 2 दरम्यान हा विमानतळ ताब्यात घेण्यात येतो. त्यामुळे विमानांच्या लँडिंग संख्येवर मर्यादा येते. मोप विमानतळाचे संचालन जीएमआर समूहाकडून करण्यात येईल.
भारतीय हवाई उद्योग 95 टक्के पूर्वपदावर
पुढे बोलताना डॉ. सिंग यांनी, विमान वाहतूक उद्योग सुमारे 3.5 ट्रिलियन डॉलर्सचे पाठबळ देतो, जे जागतिक जीडीपीच्या 1.4 टक्के एवढे आहे, असे सांगितले. कोविड महामारीच्या काळात या उद्योगाला मोठा फटका बसला. तरीही जगभरातील देशांतर्गत वाहतूक आता सुधारत आहे. भारतात हवाई वाहतूक उद्योग कोविडपूर्व प्रवासी वाहतुकीच्या सुमारे 95 टक्के पर्यंत पोहोचला आहे, असे मंत्री सिंग यांनी सांगितले.
भविष्यात हवाई क्षेत्राचा विकास होणार आहे. केवळ विमानेच नव्हे तर हवेत उडणाऱया अनेक साधनांचा त्यात समावेश असेल. त्यामुळे आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल, असेही सिंग यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना, मोप विमानतळाला हल्लीच हवाई वाहतूक परवाना मिळाल्याचे सांगितले. हा विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर गोव्यात पर्यटनाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.
भारतीय अर्थव्यवस्थेची वेगाने वाटचाल : सिंधिया
यावेळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दृकश्राव्य माध्यमातून परिषदेला संबोधित केले. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करत असून पुढील 7 ते 10 वर्षांमध्ये नागरी हवाई वाहतूक क्षेत्र सुमारे 40 कोटी प्रवाशांची वाहतूक करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेने जागतिक हवाई वाहतुकीच्या 35 ते 40 टक्केपर्यंत योगदान देणाऱया संपूर्ण आशिया पॅसिफिकमधील तज्ञांना एकत्र आणले आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. राजीव बन्सल, सायमन हॉक्वार्ड यांनीही विचार मांडले.
ज्योतिरादित्य सिंधिया