मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : सोळा घन मीटरपर्यंत पाण्याचे बिल नाही,मीटर भाडे, मलनिस्सारण शुल्कही रद्द
मुख्यमंत्री म्हणाले…
- सोळा घन मीटर पाण्यासाठी एक पैसा देखील द्यावा लागणार नाही
- सर्वांनाच घरगुती पाणी मिळावे आणि तेही मोफत म्हणून योजना
- या योजनेमुळे घरांबरोबरच छोटी हॉटेल्स, रेस्टारंट्सनाही दिलासा
प्रतिनिधी /पणजी
सर्वांनाच घरगुती वापरासाठी पाणी मिळावे आणि ते मोफत मिळावे, या उद्देशाने सरकारने योजना आखलेली असून त्यासाठी दरवाढ केलेली नाही. जो दरवाढीचा प्रस्ताव अगोदरच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी तयार केला होता, त्याचीच केवळ अंमलबजावणी आता केलेली आहे. राज्यातील 52 टक्के घरांत 16 हजार लिटरपेक्षा कमी पाणी वापरले जाते. त्यामुळे या योजनेचा 50 टक्के पेक्षाही जादा नागरिकांना लाभ होणार, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, मोफत पाण्यापेक्षा जुने दर परवडणारे मुळीच नाही. उलटपक्षी सर्वसामान्य ग्राहकांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी काढलेल्या अधिसूचनेच्या अगोदर 12 मे 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेची 1 ऑक्टोबर 2020 पासून अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे.
सोळा घनमीटरपर्यंत कोणतेही शुल्क नाही
राज्यात पाण्याचे 3.18 लाख ग्राहक आहेत. त्यातील 60 टक्के घरांमध्ये 16 घनमीटर पेक्षाही कमी पाण्याचा वापर दरमहा केला जातो. दोन दिवसांपूर्वी जारी झालेल्या अधिसूचनेनुसार 16 घनमीटरपर्यंत पाण्याचा वापर करणाऱयांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मीटर भाडे देखील आकारणार नाही व मलनिस्सारण शुल्कही आकारले जाणार नाही.
एक पैसा देखील द्यावा लागणार नाही
मुख्यमंत्री म्हणाले की, जुने दर हे प्रति युनिट रु. 3.50 प्रति घन मीटर होते. 15 घन मीटरपर्यंत रु. 3.50 प्रतियुनिट प्रमाणे आकारले जात होते. 16 व्या युनिटला रु. 9 आकारले जातात. म्हणजे 16 युनिट वापरणाऱयांना रु. 61.50 प्रति महिना पाणी पट्टीचे बिल येत होते. आता त्या जागी 1 पैसा देखील देण्याची गरज पडणार नाही, असेही ते म्हणाले.
जुन्या दरानुसार 30 घन मीटरपर्यंत बिल रु. 217.50
त्याचबरोबर 30 घनमीटर पाणी वापरणाऱयांना जुन्या दरानुसार पहिल्या 15 युनिटसना रु. 52.50 पैसे. 16 ते 25 घनमीटरला रु. 9 प्रमाणे रु. 90 आणि 26 ते 50 घनमीटर ला प्रत्येकी रु. 15 आकारले जातात. यामुळे रु. 75 आकारले जाऊन एकूण बिल रु. 217.50 दरमहा आकारले जात असे.
नव्या दर पत्रकामुळे कोणताच फरक नाही
नव्या दर पत्रकामुळे फरक पडलेलाच नाही. पहिल्या 15 घनमीटरसाठी रु. 3.50 प्रतियुनिट म्हणजेच रु. 52.50 पैसे होती. 16 ते 25 घनमीटर करीता रु. 9 प्रति युनिट म्हणजेच रु. 90 होतील. त्यापुढे 26 ते 40 युनिट करीता प्रत्येकी रु. 15 या प्रमाणे दर आकारले जातील.
छोटी हॉटेल्स, रेस्टॉरंटना येणार अर्धे बिल
छोटय़ा हॉटेल्स, रेस्टॉरंटना अगोदर किमान बिल रु. 500 येत होते. त्यांनाही दिलासा देऊन त्यांना आता केवळ रु. 250 आकारले जातील. त्यामुळे सरकारने विचारपूर्वक ही पावले उचलली आहेत. नव्या अधिसूचनेचा राज्यातील 52 ते 60 टक्के ग्राहकांना निश्चितच लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.