ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोकणात बस धावणार आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी मोफत ‘मोदी’ एक्सप्रेसची घोषणा आमदार नितेश राणेंनी केली आहे.
नितेश राणे यांनी म्हटले आहे की, दरवर्षी गणेशोत्सवावेळी कोकणवासीयांसाठी आपल्याकडून बसेस सोडण्यात येतात. यंदा बसेसऐवजी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे; त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी ट्रेन सोडत आहोत. ‘मोदी एक्सप्रेस’ या नावाने ही ट्रेन दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 8 वरून सुटेल. प्रवासादरम्यान, कोकणवासीयांना 1 वेळचे जेवणही देण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये 1800 नागरिक प्रवास करु शकतात. हा प्रवास मोफत असून, 27 ऑगस्टपर्यंत सबंधितांना फोन करून आपली सीट आरक्षित करावी लागणार आहे. दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडी येथे ही ट्रेन धावणार आहे.