सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील-सहकाऱयांचे कार्य : स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 228 मृतदेहांवर अंत्यसंस्कार
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे कोरोना काळात खासगी रुग्णवाहिकांच्या चालकांनी दामदुप्पट दर आकारल्याची तक्रार होत असताना दुसरीकडे मात्र बेळगावमधील काही युवकांनी व संघटनांनी नागरिकांना मोफत रुग्णवाहिकेची सेवा देऊन अनेक रुग्णांना दिलासा दिला. त्यापैकीच आघाडीवर असणारे कार्यकर्ते म्हणजे शंकर पाटील आणि त्यांचे सहकारी. गणाचारी गल्ली येथील या युवकांनी आतापर्यंत एक हजार दोनशेहून अधिक रुग्णांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयापर्यंत मोफत सेवा दिली आहे. त्यामुळे हे युवक इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
वर्षभरापूर्वी कोरोना आला आणि आरोग्याच्या समस्या मोठय़ा प्रमाणात निर्माण झाल्या. या काळात रुग्णवाहिकांसाठी हजारो रुपये मोजावे लागत होते. सरकारी रुग्णवाहिका या केवळ कोरोना रुग्णांना सेवा देत असल्यामुळे इतर रुग्णांचे हाल होत होते. अशा परिस्थितीत गणाचारी गल्ली येथील शंकर पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी मोफत रुग्णवाहिका सुरू केली. या रुग्णवाहिकेतून बेळगाव शहरासोबतच मिरज, कोल्हापूर, सांगली तसेच आसपासच्या भागात रुग्णांची ने-आण करण्यात आली.
228 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार
कोरोना काळात सर्वात मोठी समस्या होती ती अंत्यसंस्काराची. या काळात अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयदेखील जवळ येत नव्हते. अशा परिस्थितीत शंकर पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आजवर 228 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
तीन शिफ्टमध्ये चालायचे काम
एकूण 12 तरुणांनी या कार्यामध्ये झोकून दिले होते. यासाठी दिवसाची तीन सत्रांमध्ये विभागणी करण्यात आली. सकाळी 5 ते 12, दुपारी 12 ते 6 व सायंकाळी 6 ते रात्री 12 अशा शिफ्ट करून त्याद्वारे कार्यकर्ते रात्रंदिवस कार्यरत होते. गणाचारी गल्ली येथील स्वामी विवेकानंद फ्लू क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे. यापुढेही समाजाच्या सेवेसाठी कार्यरत राहू असे या युवकांनी सांगितले. या युवकांमध्ये सचिन पाटील, संदेश लाथे, विनायक पुजारी, पप्पू शिंदे, ओमकार गवळी, यश साळुंखे, दौलत कणबरकर, प्रितेश मलकाचे, प्रज्वल किटवाडकर, विठ्ठल कोकितकर, नवीन हंचिनमनी, अभिषेक माडिवाले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.
शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून सेवा
कोरोनाचा काळ हा प्रत्येकासाठीच कठीण होता. आमचे प्रेरणास्थान असणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला संकटातही निकराने लढा देण्याचे बळ दिले आहे. समाज संकटात असताना आम्ही घरी बसून चालणार नाही, या भावनेतून मागील वर्षभरात रुग्णवाहिका, स्वामी विवेकानंद फ्लू क्लिनिक व मृतांवर अंत्यसंस्कार सेवा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
– शंकर पाटील (सामाजिक कार्यकर्ते)