आप नेते वाल्मिकी नाईक यांची माहिती
पक्षाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मोफत वीज आश्वासनाला गोमंतकीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 2.93 लाख कुटुंबांनी पक्षाकडे नोंदणी करून या हमीला पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी दिली.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी आपच्या ताळगाव विधानसभा प्रभारी सिसिल रॉड्रिग्स यांहीची उपस्थिती होती. पुढे बोलताना नाईक यांनी, राज्यातील बहुतांश कुटुंबे वारंवार खंडित वीज आणि उच्च बिलांमुळे त्रस्त आहेत. या गंभीर विषयावर आवाज उठवणारा आम आदमी हा एकमेव पक्ष आहे, म्हणूनच लोक आज केजरीवाल यांचे मनापासून समर्थन करत आहेत, असे सांगितले.
आपच्या स्वयंसेवकांनी सुमारे 3.85 लाख म्हणजेच सुमारे 90 टक्के घरांना भेटी दिल्या. त्यावेळी प्रत्येक घरातील कुटुंबियांशी 15 ते 20 मिनिटे संवाद साधत मोफत वीज हमीचा त्यांना मिळणारा फायदा व परिणाम यावर चर्चा केली. आप सत्तेवर आल्यास 24 तास अखंडित वीज, प्रत्येकाला 300 युनिट मोफत वीज, जुनी बिले माफ आणि शेतकऱयांना मोफत वीज देण्याबद्दल केजरीवाल यांनी केलेल्या घोषणांची माहिती दिली.
आप ज्या घोषणा करत आहेत त्यापैकी ही पहिलीच आहे, जी राज्यातील सर्वसामान्य माणसाला प्रभावित करत आहे. म्हणुनच भाजप भयभीत झाली असून या घोषणेला सर्वाधिक प्रतिसाद स्वतः मुख्यमंत्री प्रतिनिधीत्व करत असलेल्या सांखळी मतदारसंघातून मिळाला आहे. सांखळीतील 88 टक्के कुटुंबांनी या घोषणेचे स्वागत करून समर्थन नोंदवले आहे. दुसऱया बाजूने वीजमंत्री नीलेश काब्राल यांनाही मोठा धक्का देत त्यांच्या मतदारसंघातील 82 टक्के कुटुंबांनी केजरीवाल मॉडेलवर विश्वास दाखवत आपच्या हमीचे समर्थन केले. या घोषणेची अंमलबजावणी झाल्यानंतर गोव्यातील 87 टक्के लोकांना शून्य बिले मिळतील, अशी माहिती रॉड्रिग्स यांनी दिली.
म्हापसातील सलमान खान यांचा आपमध्ये प्रवेश
दरम्यान, आम आदमी पक्षात प्रवेश करणाऱयांची संख्या दिवसेदिवस वाढत असून शनिवारी म्हापसा येथील सामाजिक कार्यकर्ते सलमान खान यांनी कार्यकर्त्यांसह आपमध्ये प्रवेश केला. आपचे राज्य संयोजक राहुल म्हांब्रे आणि पक्षाचे नेते सुनील सिग्नपूरकर यांच्या उपस्थितीत ते पक्षात सामील झाले.
गेल्या दोन वर्षांपासून ते राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर गोवा प्रमुख होते. कचरा व्यवस्थापनावर काम करण्याबरोबरच गेल्या सुमारे 20 वर्षांपासून दयनीय स्थितीत असलेल्या तार नदीच्या जीर्णोद्धारासाठीही त्यांनी लढा दिला आहे. लॉकडाऊन काळात गरीब गरजवंत, रोजंदारीवर काम करणाऱया मजुरांना खाद्यपदार्थ पुरवण्याचे काम देखील त्यांनी केले आहे.
स्थानिक आमदार आणि भाजप सरकारच्या कार्यकाळात गेल्या 20 वर्षांत म्हापसाचा कोणत्याच विकास झालेला नाही. बाजाराची बकाल स्थिती, खराब रस्ते आणि पार्किंगची अस्ताव्यस्थता या मुद्यांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. म्हापसाचा विकास करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या कारभाराला कंटाळूनच आपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे म्हपसातील समस्यांवर काम करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मिळवणे व वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या सोडविणे हाच उद्देश असल्याचे खान यांनी सांगितले.
जर अरविंद केजरीवाल दिल्लीत सुशासन देऊ शकतात ते गोव्यात का शक्मय होणार नाही, असे एका प्रश्नावर खान यांनी सांगितले.