गोवा फॉरवर्डचे ऋणाल केरकर यांचे मत
प्रतिनिधी/ पणजी
ऑनलाईन शिक्षण पद्धतीत आज मोबाईल ही अत्यावश्यक गरज बनली असली तरी अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱया पालकांच्या मुलांवर त्याच मोबाईलसाठी आत्महत्येसारखा मार्ग पत्करण्याची पाळी येणे ही मन विषण्ण करणारी घटना आहे. हा प्रकार अत्यंत क्लेशदायक असून मुख्यमंत्र्यांनी आतातरी हे सत्य मानून घ्यावे, असे आवाहन गोवा युथ फॉरवर्ड पार्टीचे उपाध्यक्ष ऋणाल केरकर यांनी केले आहे.
पार्टीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी अशाचप्रकारे एका विद्यार्थ्याने मोबाईलसाठी आत्महत्या केली होती. त्यावेळी भर विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी सदर आरोपाचा ठाम इन्कार करताना सदर वृत्त प्रसिद्ध करणाऱया दैनिकालाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकारानंतर आता पुन्हा एकदा विद्यार्थ्याने मोबाईलसाठी आत्महत्या केली आहे. निदान ती घटना तरी सत्य आहे का? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, असे आव्हान त्यांनी दिले.
मुख्यमंत्री सध्या स्वतःसाठी 42 लाख रुपये किंमतीची टॉप मॉडेल फॉर्च्युनर कार खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या गाडीची ट्रायल नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर घेण्यात आली आहे. अशा एका गाडीवर 42 लाख खर्च करण्यापेक्षा त्याच पैशांतून शेकडो गरजवंत विद्यार्थ्यांना मोबाईल देता आले असते, असे मत केरकर यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी केवळ खाणी एके खाणी न करता राज्याच्या अन्य विशयांकडेही लक्ष द्यावे. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या पैशांवर गुजराण करणाऱया लोकांना गेल्या कित्येक महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे हाल झालेले आहेत. त्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, तर मग 42 लाख किंमतीची कार खरेदीसाठी पैसे कुठून आणणार? असा सवाल केरकर यांनी उपस्थित केला.
पूर्वी मंत्र्यांसाठी गाडय़ा खरेदी करण्यास रु. 20 लाख पर्यंत मर्यादा होती. आता मुख्यमंत्री तब्बल 42 लाख किंमतीची गाडी खरेदी करणार आहेत. हा प्रकारच अनाकलनीय आहे. ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे. सरकारने ती थांबवावी, असे केरकर म्हणाले.
हलाखीचे जीवन जगतात काही विद्यार्थी
मोबाईलसाठी आत्महत्या केलेला पाली सत्तरी येथील 16 वर्षीय मुलगा हा ठाणे सत्तरी येथील सरकारी शाळेचा 10 वी चा विद्यार्थी होता. त्याचे वडील बस चालक तर आई सामाजिक सुरक्षा योजनेच्या पैशांवर गुजराण करत होती. वडिलांना नोकरी नाही आणि आईच्या पदरी पैसे नाहीत, अशा परिस्थितीत नवा मोबाईल घेणे दूरच राहिले, त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलच्या दुरुस्तीसाठी सुद्धा पैसे नव्हते. अशावेळी मुलाची मोबाईलची गरज ते कसे भागवणार? असा सवाल केरकर यांनी केला.
सायबर एज योजना पुन्हा सुरू करावी
अशाच हृदयद्रावक परिस्थितीत जीवन जगणारी हजारो कुटुंबे राज्यात आहेत. त्यांच्या आर्थिक स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. काही दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सायबरएज योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्या योजनेद्वारे गरीब मुलांना मोबाईल देता आले असते, परंतु सरकारला केवळ खाणीत स्वारस्य असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित अशा विशयाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही, अशी टीका केरकर यांनी केली. तसेच शक्य झाल्यास मुख्यमंत्र्यांनी ही योजना पुन्हा सुरू करावी, असे आवाहन केरकर यांनी केले. तसे झाल्यास मुख्यमंत्री ज्यांना आपले गुरू मानतात त्या मनोहर पर्रीकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही केरकर म्हणाले.