कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी पैशांपेक्षाही निर्धार आणि कल्पकता या दोन भांडवलांची आवश्यकता असते, असे म्हटले जाते. सध्या तंत्रकुशल तरुणांसाठी मोबाईल ऍप बनविण्याचे क्षेत्र असेच सोन्याची खाण ठरले आहे. या ऍप्समुळे दैनंदिन जीवनातील साध्या सोप्या कामांपासून ते अत्यंत जटील अशा स्वरुपाची व्यावसायिक कामेही सुलभरीतीने आणि वेगवान पद्धतीने करता येतात. या कामांची अचूकताही मोठी असते. त्यामुळे मोबाईल ऍप तयार करणे हा सध्याच्या काळात कल्पक तरुणांसाठी हमखास यशाचा व्यवसाय बनला आहे.
जसजसे स्मार्ट फोन्स ज्याच्या त्याच्या हातात खेळू लागले, तसतशी मोबाईल ऍप व्यवसायाने यशस्वितेची नवी नवी शिखरे पादाक्रांत करण्याचा सपाटा लावला. 2010 साली अवघा 5 कोटी डॉलरची जागतिक उलाढाल असणारा हा व्यवसाय 2025 पर्यंत एक लाख कोटी डॉलर्स (साधारणतः 75 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचेल, अशी शक्मयता व्यक्त होत आहे. साहजिकच या व्यवसायात प्रचंड नफा आहे, असे दिसून येत आहे. शिवाय मोबाईल ऍप तयार करण्यासाठी फार मोठय़ा प्रमाणावर भांडवलाची किंवा ते ऍप ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र आणि जटील वितरण यंत्रणेची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे फारशी पैशाची सोय नसलेले पण कल्पकतेच्या बाबतीत प्रचंड समृद्ध असलेले अनेक युवक आणि युवती आज या व्यवसायात पडलेले दिसून येतात.
अनेक उद्योजकांनी मोबाईल ऍप्स तयार करणाऱया कंपन्या स्थापन केल्या आहेत. प्रतिदिन जगात 1 हजार नवे ऍप्स तयार होतात, असा अंदाज आहे. यापैकी प्रत्येकी ऍप लोकप्रिय होतेच, असे नाही. तथापि, हजारातून एक ऍप लोकप्रिय झाले तरी मोठा फायदा होतो. ऍप तयार करण्याचे प्रशिक्षण देणारे विविध अभ्यासक्रमही लोकप्रिय होत आहेत. ऍप बनविणे हे बुद्धिप्रमाणेच चिकाटी आणि अनुभवाचेही काम आहे. अशा तरुणांना या कंपन्या लाखो रुपयांचे वेतन देतात. त्यामुळे एक सन्मानजनक रोजगार या दृष्टीनेही ऍप व्यवसायाकडे पाहिले जाते. सध्या भारतातील सुमारे 1 लाख उच्चतांत्रिक शिक्षण घेतलेले युवक या व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी धडपडत आहेत. येत्या पाच वर्षात ही संख्या दहा लाखांपर्यंत पोहोचली तरी आश्चर्य वाटावयास नको, असे या व्यवसायातील तज्ञांचे म्हणणे आहे. विशेषत्वाने भारतीयांसाठी ही सुवर्णसंधी आहे.