निर्यात पोहचली 4,300 कोटी रुपयांवर
नवी दिल्ली
एप्रिल ते जून 2021 तिमाही दरम्यान भारतामधील मोबाईल फोन्सची निर्यात तीन पटीने वाढून 4,300 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याची माहिती इंडिया सेल्युलर ऍण्ड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीईए) यांनी नुकतीच दिली आहे.
एक वर्षापूर्वी साधारणपणे मोबाईल फोन्सची निर्यात ही जवळपास 1,300 कोटी रुपयांची झाली होती. त्याचदरम्यान जगभरात कोरोना संकटाची पहिली लाट वेगाने पसरली होती, असे आयसीईएने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रवासानंतर मोबाईल निर्मिती व निर्यातीत महत्वपूर्ण प्रगती प्राप्त करण्यावर भारत भर देणार असून सरकारच्या पीएलआय योजना कायम ठेवण्यावर भर देणार असल्याचेही अध्यक्षांनी सांगितले आहे.
मोबाईल निर्मितीचे ध्येय
मोबाईल हॅण्डसेट निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहन दिले असून या बळावरच मोबाईल निर्मितीत अधिक विकास साधला जाण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे आयसीईएचे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू यांनी नमूद केले आहे.