आटपाट नगरातला आमचा दोस्त मोरू म्हणजे अगदी मोरू आहे. चाळीस वर्षांपूर्वी मोरूचं लग्न झालं. लग्नानंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे घरातली पूजा, कुलदैवताचं दर्शन, मध्यमवर्गीय बजेटमध्ये बसेलसा मधुचंद्र वगैरे-यथासांग पार पडल्या. लग्न नवीन नवीन असतं तेव्हाची गंमत सर्वांना ठाऊक असेल. तमाम नवरे बायकोला आपल्या पुरुषार्थाच्या, समाजातील वजनाच्या गोष्टी फुगवून फुगवून सांगत असतात. महिलांना देखील आपला नवरा देखणा, सर्वश्रे÷, जगज्जेता वगैरे वाटत असतो. मोरू आणि बायको या नियमाला अपवाद नव्हते. मोरू तिला आपल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायचा तेव्हा ती डोळय़ांची निरांजने करून पापण्यांची फडफड करीत त्याच्याकडे बघायची आणि कानात पंचप्राण का काय ते ओतून त्याच्या पराक्रमाच्या कथा ऐकायची.
एकदा त्यांना विजेचं बिल भरायचं होतं. मोरू सपत्नीक निघाला. बिल भरल्यावर दोघांना मंडईत जायचं होतं. आज मोरू बायकोला आपली वीज मंडळातली ‘वट’ दाखवणार होता. दोघे बिल भरणा केंद्रासमोर गेले. भली मोठी रांग होती. मोरूने बायकोला रांगेत उभी केली आणि म्हणाला, “मी मित्राला बोलावून आणतो. तो आला की त्याच्याकडे पैसे देऊन आपण मंडईत जाऊ. तो बिल भरेल आणि पावती घरी आणून देईल. तो रजेवर असला तर आपल्याला रांगेशिवाय पर्याय नाही. नंबर सोडू नकोस.’’ मोरू कचेरीत गेला. मित्र जागेवर नव्हता. त्याला खूप शोधल्यावर अर्ध्या तासाने सापडला. मोरू म्हणाला, “जरा बाहेर येतोस का?’’ तो म्हणाला, “तू हो पुढं.’’ मोरू पुन्हा रांगेत आला. मग अर्ध्या तासाने मित्र आला. मोरू म्हणाला, “बिल भरायचं आहे रे. केवढी मोठी रांग आहे.’’ मित्र म्हणाला, “अरे रांगेचं काय टेन्शन घेतोस? आत्ता बोलता बोलता तुझा नंबर येईल. डोंट वरी.’’ आणि मित्र निघून गेला!
पुढे कोरोनाची साथ आली. मोरूकडे आलेला मेहुणा लॉकडाऊनमुळे अडकून पडला. एकदा मेहुणा घरासमोर गंमत बघत उभा असताना पोलिसांनी पकडलं. मोरूची बायको म्हणाली, “अहो दादाला सोडवा.’’ मोरूने आपल्या इन्स्पेक्टर मित्राला फोन केला. मित्र म्हणाला, “अरे, लॉकडाऊन असताना बाहेर पडायचं नसतं. पण डोंट वरी. पोलीस त्याला नियमानुसार काय असेल ती शिक्षा करून लगेच सोडून देतील.’’
असे हे मोरूचे मित्र!