पाचगाव / प्रतिनिधी
निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेल्या मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये दर सहा महिन्याला उपसरपंच पदावरील व्यक्ती बदलण्यात येत असल्यामुळे मोरेवाडी येथील उपसरपंच पद नावापुरतेच राहिले आहे. उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर लावलेला गुलाल निघण्याआधीच उपसरपंच पदावरील व्यक्तीला केवळ सहा महिन्यातच राजीनामा द्यावा लागत असल्यामुळे मोरेवाडी येथील उपसरपंच पद हे शोभे पुरतेच उरले असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
मोरेवाडी, तालुका करवीर येथील ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न सुमारे साठ लाख रुपये असून इतके प्रचंड उत्पन्न असणाऱ्या गावच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना खूष करण्यासाठी दर सहा महिन्याला नवीन उपसरपंच नेमण्यात येत आहे. मोरेवाडी ग्रामपंचायतींमध्ये एकूण 15 ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यापैकी 12 सत्ताधारी गटाकडे तर तीन विरोधी गटात आहेत. दर सहा महिन्याला उपसरपंच यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी येथील सरपंच रूपाली बाजारी यांना कॉल केला असता त्या नॉटरिचेबल होत्या. येथील सरपंच आणि ग्रामसेवक नेहमीच नॉटरिचेबल असल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
दरम्यान, मोरेवाडी येथील उपसरपंच पद नावालाच असून हे पद दर सहा महिन्यातला सत्ताधारी गटाकडून बदलेले जात असल्यामुळे गावातील विकास कामांना खीळ बसली आहे असे मत मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी व्यक्त केले.