वार्ताहर / पाचगाव
मोरेवाडी (ता. करवीर )येथे एकाच ठिकाणी असलेल्या 14 गवताच्या गंजीना मंगळवारी दुपारी आग लागून भस्मसात झाल्या. यामध्ये 7 शेतकऱ्यांचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मोरेवाडी येथे मोकळ्या जागेत एकाच ठिकाणी गावातील सात शेतकऱ्यांनी 14 गवताच्या आणि कडब्याच्या गंजी रचून ठेवल्या होत्या. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक या गवताच्या गंजीनी पेट घेतला. बघता बघता ही आग पसरत गेली आणि लागून लागून असलेल्या 14 गवताच्या गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळा साठी आग विजली. मात्र पुन्हा वाऱ्यामुळे आग सर्वत्र पसरली आणि गवताच्या सर्व गंजींची राख झाली.
ही आग कोणी लावली की लागली याबद्दल नागरिकांमधून तर्कवितर्क करण्यात येत आहेत .आक्काताई वेताळ ,महेश सुदाम मोरे ,हिंदूराव पाटील ,पांडुरंग यादव ,कस्पटे ,प्रकाश मोरे, संतोष रांगोळे या शेतकऱ्यांच्या या गवताच्या गंजी होत्या. काही दिवसांपूर्वीच शेंडा पार्क येथे लागलेल्या आगीत गवत व सुमारे 20 हजार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. शेंडा पार्क मधील आगीमुळे मोरेवाडी ग्रामस्थांना तेथील मिळणारे गवत ही नष्ट झाले होते. यामुळे मोरेवाडी ग्रामस्थांन समोर जनावरांना कोणता चारा द्यायचा हा प्रश्न पडला आहे .मोरेवाडी मधील अनेक कुटुंबे ही जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत .मात्र आता चारा मोठ्या प्रमाणात जळाल्यामुळे जनावरांच्या उपासमारीचा प्रश्न उभा राहिला आहे .शासनाने आर्थिक मदती बरोबरच जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी या शेतकऱ्यांमधून होत आहे.