प्रतिनिधी/ धारबांदोडा
ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोव्यात गेल्या चार दिवसांमध्ये अचानकपणे कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हे सर्व रुग्ण परराज्यातून गोव्यात आले होते व त्यापैकी काही जणांनी मोले चेकनाक्यावरुन गोव्यात प्रवेश केला होता. त्यामुळे मोले भागात भितीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी काही नागरिकांनी मोले पंचायत मंडळाची भेट घेऊन मोले चेकनाक्यावरुन होणारी वाहतूक बंद करण्याची मागणी केली.
धारबांदोडा तालुक्याचे मामलेदार अभिर हेदे यांनी पंचायत मंडळ व नागरिकांशी त्यासंबंधी चर्चा केली. नागरिकांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या लेखी स्वरुपात सादर करण्याची सूचना करीत, त्या वरिष्ठापर्यंत पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पंचायत मंडळातर्फे धारबांदोडा तालुका उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले आहे. गोव्यात सध्या कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने व मोले चेकनाक्यावरुन वाहनांची वर्दळ वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यासाठी वाहतूक बंद करण्यासंबंधी पंचायतीवर नागरिकांकडून दबाव वाढत आहे. मोले चेकनाक्यावरुन केवळ अत्यावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱया वाहनांनाच प्रवेश दिला जावा. प्रवासी व इतर सर्व वाहनांना बंदी घालावी, असे या निवेदनात म्हटले आहे. परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली न गेल्यास व नागरिक रस्त्यावर उतरल्यास त्याला पंचायत मंडळाला जबाबदार धरता येणार नाही, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
मामलेदार अभिर हेदे यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मोचे चेकनाक्यावरुन येणारी वाहने मोले बाजारात पार्क केली जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये काळजी व भिती वाढली आहे. गेल्या वर्षभरात अनमोड घाटमार्गे कमी प्रमाणात वाहतूक होत होती. मात्र लॉकडाऊनच्या काळात या मार्गावरील वाहतूक दुपटीने वाढली आहे, अशी तक्रार शरदचंद्र खांडेपारकर यांनी केली. वाहने पार्क केल्यानंतर चालक चहासाठी खाली उतरतात. चहा घेतल्यानंतर ग्लासमध्ये राहणारा चहा जमिनीवर टाकतात. ज्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे एका महिलेने सांगितले. सरकाने वेळीच योग्य ती दखल न घेतल्यास सोमवारी मोलेतील सर्व दुकाने बंद ठेऊन व सामाजिक अंतर राखून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नागरिकांची समजूत काढताना मामलेदार हेदे म्हणाले, लोकांनी कायदा हाती घेऊ नये. सध्या 144 कलम म्हणजेच जमावबंदी लागू आहे. चेकनाक्यावरुन वाहतूक बंद करणे आपल्या हातात नाही. ग्रामस्थांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या आपण सरकारच्या संबंधीत अधिकाऱयांपर्यंत पोचवू शकतो. तोपर्यंत संयम बळगावा. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सरपंच स्नेहलता नाईक, उपसरंपच सुशांत भगत, पंचसदस्य रामकृष्ण गावकर, समर कदम, बाबू शेळके, तन्वी केरकर हे उपस्थित होते. कुळेचे पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांचीही उपस्थिती होती.