युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राला निवेदन
प्रतिनिधी / मडगाव
मोले येथे पर्यावरणाची हानी करून तामनर वीज प्रकल्प उभारला जात असल्याने, त्याला स्थानिक लोकांकडून तीव्र विरोध असताना देखील सरकार हा वीज प्रकल्प पुढे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डने हा विषय आत्ता युनेस्को जागतिक वारसा केंद्र, फ्रान्स आणि आययूसीएन जागतिक वारसा कार्यक्रम, स्वित्झर्लंड यांच्याकडे नेला आहे.
काल बुधवारी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोले येथील तामनर वीज प्रकल्प, रस्त्याचे चौपदरीकरण, कोळसा वाहतूक करण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण या सर्वांना स्थानिक जनतेने तीव्र विरोध दर्शविला तर राज्यातील भाजप सरकार जनतेच्या भावनांची कदर न करता हे प्रकल्प पुढे नेत असल्याने आपल्याला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हे विषय न्यावे लागत असल्याची माहिती श्री. सरदेसाई यांनी दिली.
मॅचटिल्ड रॉसलर (संचालक, युनेस्को जागतिक वारसा केंद्र, फ्रान्स) आणि पीटर शॅडी (संचालक, आययूसीएन जागतिक वारसा कार्यक्रम, स्वित्झर्लंड) यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवून त्यांनी गोव्यात पर्यावरणाची हानी करणाऱया प्रकल्पावर जागतिक पातळीवरून निर्बंध घालावे अशी मागणी केली आहे.
या निवेदनात श्री. सरदेसाई यांनी म्हटले आहे की, नोव्हेंबर 2020 पासून गोव्यातील जनता व खास करून युवा पिढी एकत्र येऊन भगवान महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यानात होऊ घातलेल्या तामनर वीज प्रकल्प, रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण (तिनयघाट-कर्नाटक ते मडगाव-गोवा) व राष्ट्रीय महामार्ग 4 ए बेळगांव-कर्नाटक ते पणजी यांना तीव्र विरोध करीत आले आहेत. मात्र, सरकार हे प्रकल्प पुढे नेत आहे. भगवान महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यान हे दोन्ही पश्चिम घाटा अंतर्गत येत असून पश्चिम घाट युनेस्को संरक्षित जागतिक वारसा केंद्रा समाविष्ठ करण्यात आलेला आहे.
पश्चिम घाटाचा जैवविविधतेत जागतिक पातळीवर आठवा क्रमांक लागत असून जैवविविधतेत हॉटस्पोट म्हणून गणला जातो. पश्चिम घाट अंतर्गत म्हादई वन्यजीव अभयारण्य, नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य, खोतीगांव वन्यजीव अभयारण्य, काली (अंशी-दांडेली) वाघ राखीव वनक्षेत्र इत्यादीचा समावेश होत आहे. पश्चिम घाट वनक्षेत्र सुमारे 2,200 चौरस किलोमीटर असून वाघांची वस्ती असलेले हे एक उत्तम स्थान म्हणून गणले जात आहे.
सरकार तर्फे होऊ घातलेल्या प्रकल्पामुळे गोव्यात वाघांची वस्तीच नष्ट होण्याची भीती आहे. त्याच बरोबर बिबटय़ा, वन्य कुत्री, अस्वल, साळींदर, गवे रेडे इत्यादी वन्य प्राण्यावर देखील विपरित परिणाम होईल. हे वन्यप्राणी कायमचे नष्ट होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. मोले अभयारण्यात मोठय़ा प्रमाणात फुलपाखंरे व पक्षी आढळून येतात त्यांनाही या प्रकल्पामुळे धोका असल्याचे म्हटले आहे.
मोले परिसरात दूधसागर व तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर ही दोन हिंदू देवांची जागृत स्थळे असून त्यांना देखील या प्रकल्पामुळे धोका निर्माण झालेला आहे. दूधसागर धबधबा तर साता समुद्रापार प्रसिद्ध झालेला आहे. त्याच बरोबर तांबडी सुर्ला येथील महादेवाचे मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या सर्वांचे संवर्धन व जतन होणे आवश्यक असताना, सरकारच त्यावर घाला घालू पहात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मोले येथील तीन वीज प्रकल्प, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण तसेच रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण यामुळे सुमारे 70 हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्याचा थेट परिणाम हा गोव्याच्या पर्यावरणावर होण्याची भीती देखील व्यक्त केली आहे. जागतिक वारसा केंद्राने या सर्व प्रकाराची दखल घेऊन कृती करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
भाजपच्या आमदार मोजतायत संख्या
सद्या भाजपचे आमदार या प्रकल्पांना विरोध करणाऱया लोकांची संख्या मोजू लागले आहेत. पण, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की, आज संख्या कमी वाटत असेल तर त्यांनी जरूर तसा समज करून घ्यावा. परंतु, तशीच परिस्थिती आली तर ही संख्या किती दुप्पट होतील याचा विचार करणे त्यांना कठीण जाईल. मोले बचावसाठी लढणाऱया आंदोलकांना गोवा फॉरवर्डचा पूर्ण पाठिंबा असून मोलेचा बचाव केला जाईलच असा निर्धारही श्री. सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.