आटपाट नगरातील मूळ प्रधानराणीमाशीची एक कोटी चार लाख दहा हजार पाचशे एक्कावन्नावी थेट वंशज असलेली प्रधानराणीमाशी प्रथमच स्वतः पोळय़ाबाहेर आली होती. आटपाट नगरात काही हजार पोळी आहेत. प्रस्तुत पोळे हे आटपाट नगरातल्या प्रधानराणीमाशीचे पोळे. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात बातमी आली होती की विविध कंपन्यांच्या मधामध्ये साखरेची भेसळ असते. त्यावर चर्चा करण्यासाठी प्रधानराणीमाशीने सभा भरवली होती.
मध विकणाऱया कंपन्यांनी खुलासा केला होता की आटपाट नगरात नगदी पिके घेण्याचे प्रमाण बेसुमार वाढले आहे. मधमाशा फुलांऐवजी उसातला रस चोखतात, त्यामुळे मधामध्ये साखर आढळते. सरकारी प्रवक्ता असलेल्या एका अचरट माशीने निवेदन दिले होते की यात शेजारच्या रानातील दहशतवादी गोमाशा, पिसवा वगैरेंचा हात आहे. ही माशी अचरट विधानांसाठी कुप्रसिद्ध होती. निवडणुकीच्या वेळी फुलपाखरांवर टीका करताना तिने म्हटले “कितीही मकरंद मिळाला तरी रडतात, साली, फुलपाखरे.’’ यातील ‘साली’ शब्दामुळे एकच गहजब माजला होता. शेवटी सरकारने जाहीर केले की ते त्या प्रवक्त्याचे खाजगी मत आहे.
विरोधी पक्षातल्या मधमाशीने आरोप केला की प्रधानराणीमाशीने सत्तेवर आल्यापासून सरकारी पोळी मधसंकलन करणाऱया मधमाशांच्या खाजगी कंपन्यांना विकायचा तडाखा लावला आहे. ‘कर लो मध पोळे में’ हे या कंपन्यांचे घोषवाक्मय आहे. देशातल्या दोनच खाजगी कंपन्यांच्या राणीमाशांवर प्रधानराणीमाशीची मेहेरनजर आहे. सरकारी मधमाशांनी याला प्रत्युत्तर दिले की या दोन खाजगी कंपन्यांमुळे जंगलातल्या मधमाशांसाठी मुबलक रोजगार निर्माण झाला आहे.
सभा सुरू झाल्यावर सर्व मधमाशांनी गुणगुण थांबवली. प्रधानराणीमाशीने आपल्या मनातली गोष्ट उघड केली, मधमाशांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोणीही पोळय़ाशी द्रोह करू नये.
अस्वले झाडावर चढून पोळय़ांचा विध्वंस करतात आणि मध पिऊन टाकतात. अस्वल केसाळ असल्याने त्याला चावता येत नाही. प्रधानराणीमाशीने व अमात्यमाशांनी अस्वलांचा थेट उल्लेख न करता इशारा दिला की काही केसाळ वन्यप्राणी पोळय़ांवर दहशतवादी हल्ले करतात. त्यांना चोख उत्तर दिले जाईल.
मधातल्या भेसळीवर बोलताना एका मोठय़ा पोळय़ाची मुख्य अमात्य असलेल्या राणीमाशीने तोडगा सुचवला, “आजसे पुष्परस का नाम इक्षुरस.’’
मध संकलनाचे अधिकार असलेल्या खाजगी कंपन्यांनी आपल्या जाहिरातीची कॅप्शन बनवली “ऊस डोंगा परी मध नोहे डोंगा, काय भुललासी मधाचिया रंगा.’’