चंद्रकांत देवरुखकर/ सातारा
बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है ।
मौत से आंख मिलाने की जरूरत क्या है ।
सबको मालूम है, बाहर की हवा है कातिल ।
यूँ ही कातिल से उलझने की जरूरत क्या है ।।
अगदी डोळय़ात झणझणीत अंजन घालणाऱया ओळी ऐकून देखील साताऱयातील नागरिकांची सुधारण्याची मानसिकता काही दिसत नाही. जणू घरात राहून आपण प्रशासनावर प्रचंड मोठे उपकारच करत असल्याची भावना काही सातारकर दाखवत आहेत. कोरोनाचे संकट मोठे झाले तर किती त्रास होईल याची कल्पना असताना देखील उगाचच घेतली पिशवी निघाला घराबाहेर असे प्रकार सुरु आहेत. खरंच ज्याना गरज आहे त्यांना याचा फटका बसत असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवीन वेळापत्रक गर्दी टाळण्याचा दिलेला संदेश कोणाच्या लक्षात कसा येत नाही. जणू काही घरात काहीच आता खायलाच शिल्लक नसल्यासारखे सातारकर रस्त्यावर खरेदीसाठी उतरत असल्याने यामध्ये फक्त पोलीस दलाचा घाम निघत असून आता एक आठवडा जनता कर्फ्यु लावण्याची वेळ येवू शकते.
मृत्यू हा शब्द म्हणायला, लिहायला सोपा आहे. मात्र, तो जेव्हा प्रत्यक्ष समोर उभा राहतो तेव्हा कोणाचीही त्याच्यापुढे उभे राहण्याची हिंमत होत नाही. कोरोना नावाचा विषाणू घराबाहेर पडला तर तुम्हाला मृत्यू देण्यासाठीच उभा असताना उगाचच विषाची परीक्षा घेण्याचा अनुभव घेत असलेल्या सातारकरांना आता जनता कर्फ्युसारखा कडक लॉकडाऊनचा आदेश दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही याचे असे प्रशासनाला वाटण्याची वेळ सातारकरांनो, येवू देवू नका. जगायला काय लागते हो ? एखादा दिवस इकडे, तिकडे आपण खपवून जीवनाचा गाडा ढकलतच असतो. मात्र आता लॉकडाऊनला केवळ एक महिना एक दिवस झालाय. या कालावधीत कितीजणांनी गंभीरपणे प्रशासनाला साथ दिली असा प्रश्न मनाला विचारुन आपली पुढील वाटचाल ठेवली पाहिजे.
एक महिन्यापूर्वी साताऱयात कोणीही बाधित रुग्ण नसताना सातारकरांनी कडक जनता कर्फ्यु पाळला. त्यानंतर मात्र उगाचच घरात बसण्याची जणू काही प्रशासनाने शिक्षा दिली असल्यासारखे चाळे सातारकर गेल्या महिन्याभरात करत आहेत. नेमके याच काळात जिल्हय़ातील जावली तालुक्यात पाच, पाटण, फलटण, खंडाळा, सातारा शहरात प्रत्येकी एक एक बाधित तर आता कराड खूपच संवेदनशील झाले आहे. 17 कोरोना बाधितांच्या संख्येने सातारा जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह राज्य शासनाचे आदेशानुसार परिस्थिती हाताळण्याचा चांगला प्रयत्न करत आहेत.
दुसरीकडे पोलीस व आरोग्य विभागाची लढाई सुरु आहे. रस्त्यावर बेशिस्तपणे नागरिक ही लॉकडाऊनची मोठे डोकेदुखी ठरतेय. शेवटी जिल्हाधिकाऱयांनी सकाळी 9 ते 11 व सायंकाळी 7 ते 9 अशी वेळ केली. मात्र सायंकाळी 7 नंतर जणू काही कोरोना काही मुर्खांना भेटणारच नसल्यागत सातारकर रस्त्यावर फिरुन पोलिसांच्या डोक्याचा ताप वाढवत आहेत. शेवटी आता सकाळी 9 ते 11 असे सुधारित वेळापत्रक केले. काही नवीन सुविधाही दिल्या आहेत. मात्र सातारकरांची जत्रा काही संपत नाही. शेवटी मिलिटरी बोलवण्याची वेळ येवू देवू नका यासाठी सतर्क राहून घराबाहेर पडला नाही काहीही बिघडत नाही. बाहेर पडल्यावर परिणाम काय होतील हे माहिती असताना गर्दी करण्याचा मुर्खपणा सातारकरांनी मनापासून टाळायला हवा अन्यथा पुढील कठोर उपाय सोसणार नाहीत व येणारी परिस्थिती कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही.