नवी दिल्ली :
म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मियंट 4 दिवसांच्या भारताच्या दौऱयावर आले आहेत. दौऱयाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मियंट यांनी हैदराबाद हाउसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. त्यांच्या या दौऱयात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने चर्चा होणार आहे. मोदींची भेट घेतल्यावर म्यानमारच्या राष्ट्रपतींनी राजघाट येथे जात महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच त्यांनी विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे.
राष्ट्रपतींसह म्यानमारच्या प्रथम महिला डाव चो चो या देखील दौऱयावर आल्या आहेत. ‘शेजारी प्रथम’ तसेच ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणांतर्गत म्यानमारशी असलेल्या संबंधांना प्राधान्य देण्यात आले आहे. म्यानमारशी असलेले आमचे संबंध सर्वच क्षेत्रांमध्ये वेगाने वृद्धिंगत होत असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यीं ट्विट करत म्हटले आहे. नवी दिल्ली येथील अधिकृत बैठकीनंतर राष्ट्रपती यू विन मियंट हे आगरा तसेच बोधगयाचा दौरा करणार असल्याचे समजते.
तत्पूर्वी नौदलप्रमुख ऍडमिरल करमवीर सिंग यांनी 17 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत म्यानमारचा दौरा पूर्ण केला आहे. भारत आणि म्यानमार यांच्यातील द्विपक्षीय सागरी संबंध बळकट करणे हा त्यांच्या दौऱयाचा उद्देश होता. हिंदी महासागर नौदल संघटनेचा (आयओएनएस) म्यानमारही सदस्य आहे. आयओएनएस अंतर्गत होणाऱया कार्यक्रमांमध्ये म्यानमारचे नौदल सामील होते. तसेच दोन्ही देशांचे नौदल ऍडमिरल कप, ‘मिलन’ सराव आणि मेरीटाईम कॉन्क्लेव्हद्वारे परस्परांच्या संपर्कात असते.