म्यानमार सैन्याने चालविली विशेष मोहीम
वृत्तसंस्था/ शिलाँग
विकासात महत्त्वपूर्ण भागीदार होणे आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी म्यानमार सैन्याने स्वतःच्या भूमीवरून कार्यरत भारतविरोधी उग्रवादी समुहांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. म्यानमारच्या सुरक्षा दलांनी स्वतःच्या देशात शिबिरांची निर्मिती करणाऱया भारतविरोधी उग्रवादी समुहांच्या विरोधात कारवाई केली आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मी या उग्रवादी समुहाने अलिकडेच आसाम रायफल्सचे एक कर्नल आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या घडवून आणली होती. या समुहाच्या विरोधातही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
भारतीय सैन्य यासंबंधी म्यानमारच्या सैन्य राजवटीच्या संपर्कात आहे. म्यानमारने अलिकडेच 5 भारतविरोधी उग्रवाद्यांना भारतीय यंत्रणांच्या स्वाधीन केले आहे. या उग्रवाद्यांना एका विशेष विमानाने भारतात आणले गेले होते. म्यानमार सैन्याकडून करण्यात आलेल्या कारवाईत उग्रवादी समुहांना झालेल्या नुकसानीची पूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.
आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरसह 5 सैनिकांना 13 नोव्हेंबर रोजी मणिपूर येथील दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झाले होते. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर (सीओ) कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांच्या पत्नी आणि 8 वर्षीय मुलाने जीव गमावला होता. भारत-म्यानमार सीमेनजीक दहशतवाद्यांनी घात लावून हा हल्ला घडवून आणला होता. तत्पूर्वी भारताने डोगरा रेजिमेंट बटालियनवर हल्ला करणाऱया उग्रवादी समुहांच्या विरोधात लक्ष्यभेदी कारवाई केली होती.