दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सला 5 गडी राखून मात दिली, त्यावेळी शेवटच्या षटकात 17 धावांचे संरक्षण करायचे असताना चेन्नईचा कर्णधार धोनीने रविंद्र जडेजाकडे ते षटक का सोपवले, याची बरीच चर्चा झाली. जडेजाऐवजी डेव्हॉन ब्रेव्होकडे गोलंदाजी सोपवली असती तर तो भेदक मारा करु शकला असता, असे अनेकांचे मत होते. अक्षर पटेलने जडेजाच्या त्या शेवटच्या षटकात 3 गगनचुंबी षटकार खेचत धोनीचा तो निर्णय कसा चुकीचा होता, हेच जणू अधोरेखित केले. पण, सामना संपल्यानंतर धोनी प्रसारमाध्यमांना समोर आला आणि त्याचवेळी ब्रेव्होऐवजी जडेजाकडे चेंडू सोपवणे का भाग पडले, याचा खुलासा झाला.
‘ब्रेव्हो त्यावेळी पूर्ण तंदुरुस्त नव्हता. तो दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आणि परत येऊच शकला नव्हता. तो उपलब्ध नसल्यामुळे आमच्याकडे दोनच पर्याय बाकी होते. ते म्हणजे जडेजा व कर्ण शर्मा. मी जड्डूचा पर्याय निवडला’, असे धोनी याप्रसंगी म्हणाला.
अर्थात, धोनीने यावेळी शतकवीर शिखर धवनची मुक्त कंठाने प्रशंसा केली आणि धवनच्या फटकेबाजीमुळेच दिल्लीला सहज बाजी मारता आल्याचे स्पष्ट केले. ‘धवनची विकेट आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. पण, आमच्या क्षेत्ररक्षकांनी त्याला बरीच जीवदाने दिली. तो क्रीझवर राहिला तर स्ट्राईक रेटही बराच उंचावतो. खेळपट्टी दुसऱया डावात अधिक उत्तम होती. दुसऱया डावात फलंदाजी करणे अधिक सोपे होते. पण, धवनच दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने उत्तम फलंदाजी केली आणि त्याला सहकाऱयांचीही उत्तम साथ लाभली’, असे धोनी येथे म्हणाला.