नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
तालिबानने काबूलची राजधानी ताब्यात घेण्यापूर्वीच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून निघून गेले होते. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रय घेतला आहे. यावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी यांनी भारताने अशरफ घनी यांना आश्रय दिला पाहिजे असे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, भारताने अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती डॉ.अशरफ घनी यांना येथे राहण्याचे आमंत्रण द्यावे. ते तुलनेने उच्च शिक्षित आहेत आणि तालिबानने आधुनिक अमेरिकी शस्त्रास्त्रांसह पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसखोरी केली तर ते भारताला मदत करु शकतात, असे मत त्यांनी मांडले आहे.
अफगाणिस्तान सोडल्यानंतर अशरफ घनी यांनी संयुक्त अरब अमिरातमध्ये आश्रय घेतला आहे. युएई परराष्ट्र मंत्रालयाने अशरफ घनी त्यांच्या कुटुंबियांसह अरब अमिरातमध्ये असल्याची अधिकृत घोषणा केली. यूएई सरकारच्या म्हणण्यानुसार, घनी आणि त्यांचा कुटुंबियांना मानवी आधारावर आश्रय देण्यात आला आहे.
मी अजूनही अफगाणिस्तानमध्ये परत जाण्याचा मार्ग शोधतोय – अशरफ घनी
तालिबानने अफगाणिस्तानच्या काबुलपर्यंत सत्ता काबीज करताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन केले. मात्र देशाबाहेर पलायन करताना अशरफ घनी यांनी चार कार आणि हेलिकॉप्टर भरून पैसासोबत नेला, असे अनेक आरोप केले जात आहेत. मात्र राष्ट्रपती अशरफ घनी यांनी अफगाणिस्तानमधून पैसा घेऊन पळून गेल्याचे त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. अशरफ घनी यांना एका नवा व्हिडिओ पोस्ट करत यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, माझा देशातून पळून जाण्याचा किंवा मायभूमी अफगाणला सोडण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी रक्तरंजित लढाई थांबण्यासाठी संयुक्त अरब अमिरात आहे. मी अजूनही अफगाणिस्तानमध्ये परत जाण्याचा मार्ग शोधतोय. मी न्याय, अफगाणाचे सार्वभौमत्व आणि खरोखर इस्लामिक मूल्यांना पुर्नजीवित करण्यासाठी लढाई लढत राहीन.